ढगाळ वातावरणाचे सिंधुदुर्गात संकट

Cloudy weather crisis in Sindhudurg
Cloudy weather crisis in Sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आंबा आणि काजुला पालवी आणि मोहोर येण्याच्या स्थितीत हे वातावरण निर्माण झाल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. थंडी गायब झाली असून वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. आंबा आणि काजुला पालवी आणि काही ठिकाणी मोहोर येण्याच्या काळात हे वातावरणात बदल झाल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांमध्ये चितेंचे वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजुवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात दोन- तीन दिवसच चांगली थंडी पडली होती. त्यामुळे थंडी कायम राहील, अशी अपेक्षा बागायतदारांना होती. थंडीच्या प्रमाणावरच आंबा आणि काजुचे उत्पादनाचे भवितव्य अवलंबुन असते; परंतु सध्या थंडीने दडी मारली असून वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला आहे. त्यातच गेल्या दोन तीन दिवसांपासुन जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. 


यापुर्वीच ढेकण्या, फांदीमर अशा विविध कीडरोगांनी काजु बागायतदार त्रस्त झालेले आहेत. आंब्यावर तुडतुड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यातुन मार्गक्रमण करीत सध्या बागायतदार बागांमधील तण काढण्यासोबत प्राथमीक फवारणीचे काम करीत आहेत. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे बागायतदारांचे काम वाढणार आहे. कीड प्रतिबंधक फवारण्या बागायतदारांना कराव्या लागणार आहेत. झाडांना आलेली पालवी टिकली तरच झाडाला चांगला मोहोर येवुन चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळते; परंतु पालवी किंवा मोहोर टिकविण्यात अपयश आले तर मात्र शेतकऱ्यांना उत्पादन मिळत नाही. 

आंबा आणि काजुचा गेला हंगाम सुरूवातीला वातावरणातील बदलामुळे आणि त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे वाया गेला. आंबा हंगाम सुरू होतानाच लॉकडाऊन झाल्यामुळे सुरूवातीच्या काळात बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आंबा विक्रीस परवानगी मिळाली; परंतु काजु बागायतदारांचे नुकसान टाळता आले नाही. काजु बी दरांमध्ये प्रचंड घसरण झाली. 150 ते 160 रूपये सरासरी असलेला दर 60 ते 70 रूपयांपर्यत आला. त्यामुळे काजु बागायतदार उद्‌ध्वस्त झाले. अनेकांना बागांमध्ये केलेला खर्च देखील बागातुन निघाला नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबुन आहे. 

काजुच्या काही झाडांना पालवी तर काहींना मोहोर येण्याची प्रकिया सुरू झाली आहे. ही प्रकिया सुरू असतानाच आता ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या वातावरणामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षी अशाच प्रकारे सातत्याने ढगाळ वातावरण राहीले. त्यामुळे काजु पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला. यावर्षी देखील ढगाळ वातावरणाचे सावट सुरूवातीला दिसत आहे. 
- मंगेश गुरव, काजू बागायतदार, खांबाळे 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com