आंबोलीत घर पाडून मुद्देमाल चोरल्याची तक्रार

Complaint of demolition of house in Amboli and theft of property
Complaint of demolition of house in Amboli and theft of property

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील प्रसिद्ध बालरोग्यतत्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांच्या आंबोली-गोठवेवाडी येथे असलेल्या मालकीच्या दहा गुंठे जमिनीतील 40 वर्षे जुने असलेले घर तसेच लाकूड व अन्य मिळून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत डॉ. मिलींद खानोलकर यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. 
पोलिसांनी काही ग्रामस्थांना आज पोलिस ठाण्यात चौकशीसाठी पाचारण केले होते. दोन्ही बाजू ऐकून घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सहा. तौफिक सय्यद यांनी सांगितले. 

डॉ. खानोलकर यांनी 1977 साली आंबोली-गोठवेवाडी येथे 10 गुंठे जागा खरेदी केली होती. त्या ठिकाणी घर तसेच कुंपण होते; मात्र लॉकडाउन काळात त्या ठिकाणी जाणे झाले नाही. याचा गैरफायदा घेत तेथील काही ग्रामस्थांनी संगनमताने श्री. खानोलकर यांच्या मालकीचे जुने घर पाडून परवानगीशिवाय जमिनीचे सपाटीकरण केले. घर जमिनदोस्त करून लाकूड तसेच अन्य मिळून सुमारे 10 लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही माहिती समजताच मुलगा मिलींद खानोलकर यांनी मंगळवारी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. 

दरम्यान, याप्रकरणी आज आंबोलीतील काही ग्रामस्थांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद यांनी त्यांची चौकशी केली. यावेळी ग्रामस्थांनी ही जमीन स्थानिकांची असून तिथे वर्षानुवर्षे शेती केली जाते. शिवाय या जमिनीवर कबुलयतदार गावकर नोंद असून ती राज्य शासनाच्या मालकीची असल्याचे सांगितले. यावर मुलगा खानोलकर यांनी 1977 मध्ये रजिस्टर खरेदी खताने ही जमीन वडील डॉ. अरविंद खानोलकर यांनी खरेदी करून तिथे घर बांधले होते. पर्यटनासाठी आंबोलीत आल्यावर त्या घरात खानोलकर कुटुंबीय राहत असत. ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरू होती. मध्यंतरीच्या काही वर्षांत खानोलकर कुटुंबीय आंबोलीत जात नसल्याचा फायदा घेत आजूबाजूच्या काही ग्रामस्थांनी संगनमताने जेसीबी लावून ते घर जमीनदोस्त केले. घराचे किमती साहित्य चोरून नेल्याची तक्रारीत म्हटले आहे. 

सातबारा पोलिसांकडे सादर 
खरेदी खताने ही जमीन घेतली होती. ती खानोलकर कुटुंबियांच्या नावे सातबारा पदरी लागली. त्यानंतर 1990 मध्ये आंबोलीतील सर्व जमिनीवर राज्य शासनाचा अधिकार आला. याविरोधात गेली कित्येक वर्षे न्यायालयात केस लढून तो निकाल खानोलकर यांच्या बाजूने लागला आहे. तसा सातबारा पोलिसांना सादर केल्याची माहिती डॉ. मिलींद खानोलकर यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com