रत्नागिरी: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारी चाचण्याही कमी झाल्या आणि कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही चार आहे. जिल्ह्यात एकाचाही कोरोनाने मृत्यू झालेला नाही; मात्र कोरोनाचा मृत्युदर ३.७० टक्क्यांवर स्थिर आहे. आज रत्नागिरी एमआयडीसीतील एकाच कंपनीतील १० जणांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे.
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाच्या सुमारे २०९ चाचण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत आज ७५ चाचण्या झाल्या. यामध्ये ८ जणांना कोरोना झाला आहे. बाधितांमध्ये आरटीपीसीआर २, ॲण्टिजेन चाचणीत ६ आहेत. त्यात रत्नागिरी २, गुहागर ४, संगमेश्वरच्या २ रुग्णांचा समावेश आहे.
दापोली, खेड, चिपळूण, मंडणगड, लांजा, राजापूर तालुक्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. रत्नागिरीतील एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये २२ कामगार आहेत. या सर्वांची ॲण्टिजेन टेस्ट करण्यात आली. चाचणीमध्ये १० कामगारांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. बहुतांश कामगार बाहेरचे आहेत; मात्र आरोग्य यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८ हजार ६१८ झाली आहे तर ४ जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण ८ हजार १५२ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ९४.५९ टक्के झाले आहे. आतापर्यंत ५१ हजार १६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. एकूण कोरोना मृतांची संख्या ३१९ झाली असून मृत्युदर ३.७० झाला आहे. दुसऱ्या लाटेची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.