राजापूर - गेल्या सुमारे दीड महिन्यापासून रत्नागिरी तालुक्यातील सेफ तालुका म्हणून चर्चेत असलेल्या राजापुर तालुक्यामध्ये चार दिवसांपूर्वी एक कोरोना रुग्ण सापडलेला असताना त्यामध्ये आता दोन रुग्णाची भर पडली आहे. हे दोन्ही रुग्ण कशेळी गावातील एकाच कुटुंबातील आहेत. त्यामध्ये 65 वर्षीय महिलेसह एका पुरुषाचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबईतून गावाला येऊन होम क्वारंटाईन केलेले होते.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतून तालुक्यात येणाऱ्या चाकरमन्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच चार दिवसांपूर्वी तालुक्यातील विखारे गोठणे येथे तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. कोरोना झालेली संबंधित महिला मुबईतून गावाला आलेली होती. त्या महिलेच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे स्वब अहवाल निगेटीव्ह आल्याने तालुकवासीयांना दोन दिवसांपूर्वी काहीसा दिलासा मिळालेला होता. मात्र, आज मुंबईतून कशेळी येथे आलेल्या कुटुंबातील दोघेजनाचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आढळलेल्या कोरोना रुग्णामध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.
संबंधित रुग्णांसोबत आणखीन तिघेजण 16 मे रोजी गावाला मुंबई वडाळा येथून आले होते. त्यांची रत्नागिरी येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा घेन्यात आलेला स्वँबचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. आज सापडलेल्या दोन रुग्णामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता तीन वर पोहचली आहे. तालुक्यामध्ये मुंबईतून येणाऱ्या चाकरमन्यांची संख्या वाढत असताना सापडलेले कोरोनाचे तीनही रुग्ण मुंबईतून आलेले असल्याने चाकरमन्यांच्या आगमनाबाबत स्थानिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.