अख्या सिंधुदुर्ग अस्वस्थतेच्या वावटळीत

coronavirus effect in sindhudurg district
coronavirus effect in sindhudurg district

"कोरोना'ने जगाला प्रभावीत केले. सिंधुदुर्गही याला अपवाद नाही. अख्खा जिल्हा सध्या लॉकडाऊन आहे. प्रसंगी दंडुक्‍याचा धाक दाखवून संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. सिंधुदुर्ग प्रशासन लॉकडाऊनची अंमलबजावणी आणि लोकांना गरजेच्या वस्तू मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे; पण यातील बरेच उपाय शहरी भाग नजरेसमोर ठेवून आखले आहेत. गावोगाव मात्र अस्वस्थता, गैरसोय, लुबाडणुकीची भीती आणि लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर हातावर पोट असलेल्यांना उपासमारीची चिंता, यामुळे मानसिक हाल-हाल सुरू आहेत. लॉकडाऊनचा अंमल लोक हळूहळू स्वीकारत असले तरी पूर्ण जिल्ह्यात अस्वस्थतेची वावटळ आहे. सिंधुदुर्गातील शहरी आणि ग्रामीण भागात फिरून तिथली स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हे वास्तव पुढे आले. 

अख्खा जिल्हा इतके दिवस बंद राहू शकतो, घराबाहेर पडायलाही बंदी येवू शकते, विमानातून फिरणाऱ्या करोडपतींपासून, फाटके चप्पल घालून रोजच्या अन्नाची भ्रांत असलेल्या रोजंदारापर्यंत सगळ्यांना एकाच प्रकारची भीती सतावू शकते, याची कल्पनाच कोणी केली नव्हती; पण ती स्थिती प्रत्यक्ष अनुभवायला मिळतेच अशी भावना सिंधुदुर्गवासीयांची आहे. अर्थात प्रत्येकाच्या मनात भितीचे काहूर आहे. ही भिती अस्थित्वाची, कुटुंबाच्या काळजीची आणि असहाय्यतेची आहे. कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सिंधुदुर्गात मिळाल्यानंतर ही भिती कित्येक पटीने वाढली आहे. गावच्या देवावर भरवसा ठेवून जगात काहीही झाले तरी आमच्यापर्यंत काही येणार नाही या भाबड्या समजाला उभा तडा गेला आहे.

"देव गेले सुटीवर आणि विज्ञान आहे ड्युटीवर' याची जाणीव आता गावागावातल्या लहान थोरांना झाली आहे. या भीतीच्या चक्रव्यूहातून बाहेर कधी पडणार याची अनिश्‍चितता प्रत्येकाला सतावतेय. 
लॉकडाऊनमुळे शहरी आणि ग्रामीण भागाच्या सीमा रेषा अधिक गडद झाल्या आहेत. प्रत्येक ठिकाणच्या समस्या, प्रश्‍न, वेगळे आहेत. लॉकडाऊन झाले तेव्हा पहिल्या टप्प्यात शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांनी मनाला येईल तसे निर्णय घेतले. गर्दी टाळण्यासाठी बऱ्याच शहरात फक्त काही तासापुरती भाजीपाल्याची, किराणामालाची दुकाने उघडी ठेवण्याचे फतवे काढले. यामुळे लोकांची खरेदीसाठी झुंबड उडू लागली. यामुळे काही ठिकाणी दुकाने बंद केली गेली. यातून गोंधळ आणखीच वाढला. दुकानदारही माल मागवायला मागे पुढे करू लागले. पहिले चार- पाच दिवस हीच स्थिती होती. 

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी वेळीच परिस्थिती ओळखून भाजी विक्री केंद्राचे विकेंद्रीकरण करत त्यांच्या वेळा वाढवल्या. याचा परिणाम आता दिसू लागला. आता गर्दी बऱ्यापैकी नियंत्रणात आली; मात्र तरीही अनावश्‍यक फिरणाऱ्यांची संख्या मात्र पूर्ण घटलेली नाही. बाहेर गावाहून आलेल्यांबद्दलची अनामिक भिती प्रकर्षाने जाणवत आहे. 

ग्रामीण भागातील स्थिती फार वेगळी आहे. इथे शहरासारखी यंत्रणा पोचलेली नाही. किराणा दुकानात मर्यादीत साठाच उपलब्ध आहे. यामुळे अवास्तव दरवाढीच्या तक्रारीही अनेक गावातून ऐकायला मिळाल्या. घरातील करती सवरती मुले, तरूण पुण्या - मुंबईसह गोव्यात व इतरत्र नोकरीला असण्याचे प्रमाण ग्रामीण भागात खूप आहे. घरात म्हातारे आई-वडील राहतात. त्यांचे आयुष्य अगदी साचेबद्ध असते. महिन्याला लागणारी औषधे, धान्य ठरलेल्या काळात आणले जाते. चाकरमानी ऑनलाईन बॅंकींगव्दारे पालकांच्या बॅंकेच्या खात्यात पैसे दरमहिन्याला भरतात. सर्रास ही बॅंकखाती गावाजवळच्या छोट्या मोठ्या शहरात असतात.

महिन्यात एकदा जायचे पैसे काढायचे आणि औषध, धान्य घेवून घर गाठायचे असा क्रम ठरलेला असतो. अशी जेष्ठ मंडळी सध्या दडपणाखाली आहेत. मुले-बाळे पुण्या- मुंबईत लॉडाऊन झाली आहे. कोरोनाच्या संकटाबाबत रोज नवीन काही ऐकायला मिळतच. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची चिंता या मायबापांना सतावतेय. यातच औषधे संपायला आलीत. धान्याचा साठाही मर्यादीत आहे. शहराकडे जायचे रस्ते बंद झाले. यामुळे ही स्थिती कधी निवळेल आणि मुले- बाळे कधी पाहयला मिळतील याची चिंता त्यांना आहे. 

हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती तर याहून गंभीर आहे. शेती-बागायतीची कामे थांबली आहेत. लोक नाईलाजाने काजू बागायतीत जात आहेत. अनेक भागात माकडतापाचे सावटही सतावते आहे. मजुरी करणाऱ्यांना काम मिळेनासे झाले आहे. हातात असलेल्या मर्यादीत पैशात घर कस चालवायच याची चिंता त्यांना सतावते आहे. काजूचे दर कोसळत आहेत. पुढचा काळ काय नवा "दशावतार' मांडेल याची चिंता सगळ्यांनाच सतावत आहे. 

गाव पातळीवर काही भागात ग्रामपंचायती तेथील तरूण स्वयंस्फूर्तीने चांगली पावले उचलत असल्याचेही दिसले. गावात स्वच्छतेबाबत ते जागृती करताना दिसत आहेत. जिल्ह्याबाहेरून आलेल्या व उघड फिरणाऱ्यांना घरात थांबण्याचा खास मालवणी भाषेतील इशाराही हे तरूण देत आहेत. काही गावात तात्पुरती नाकी उभी केली आहेत. तिथे हात धुण्याची सोय केली आहे. बाहेरून येणाऱ्यांची चौकशी केली जात आहे; पण काही भागात अतिउत्साहही प्रकर्षाने दिसत आहेत. यात सार्वजनिक रस्ते, दगड लावून, कुंपण घालून बंद करणे, एखाद्याला जुन्या आकसातून कोरोनाचे निमित्त करून जेरीस आणल्याच्या घटनाही ऐकायला मिळाल्या. 

यातच अनेक गावात पुण्या- मुंबईतील चाकरमानी दाखल झाले आहेत. यातील अनेक जण उघड फिरत आहेत. काहींनी आरोग्य तपासणीही केलेली नाही. त्यांच्याबद्दल, त्यांच्या सहवासाबद्दलची अनामिक भितीही अनेक गावातून ऐकायला मिळाली. कोरोना बाबतच्या अफवाही बऱ्याच गावात ऐकायला मिळत होत्या. अन्न-धान्याचा पुरवठा अनियमीत झाला तरी घरात पेज-भात खावून आम्ही तीन-चार महिने सहज काढू शकतो हा विश्‍वासही अनेकजण अगदी अभिमानाने बाळगून असल्याचे जाणवले. 

स्थिती काहीही असली तर प्रशासनाने कमी वेळात चांगली पावले उचलली हे मात्र प्रकर्षाने जाणवले. लॉकडाऊननंतर पहिल्या तीन दिवसात अनावश्‍यक गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्या पाठोपाठ जीवनावश्‍यक वस्तूच्या पुरवण्याची व्यवस्था निर्माण व्हायला सुरूवात झाली. यामुळे किमान शहरी भागात तरी लोकांना आता अन्नधान्याची अडचण येणार नाही याचा विश्‍वास निर्माण झाला. आरोग्य, वीज, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत आदी विभागाचे कर्मचारी जीवावर उदार होवून तुटपुंजे सुरक्षा पर्याय उपलब्ध असतानाही गावोगाव काम करताना दिसत आहेत. त्यातही आशा वर्कर, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी अशा तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्यांना खरोखरच सलाम करावा तितका थोडा आहे. जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी, पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम आदी वरीष्ठ अधिकाऱ्यामधील समन्वय या निमित्ताने दिसून आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com