अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली तरीही क्वारंटाईन, कुणासाठी हा नियम?

coronavirus impact in sindhudurg district
coronavirus impact in sindhudurg district

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - कोरोना संदर्भातील अँटीजेन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरीही सिंधुदुर्गातील आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासन त्यांना दहा दिवस क्वारंटाईन करत असल्याने गोव्यातून गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येवू पाहणारे युवक-युवती अडचणीत आले आहेत. प्रशासन तीन दिवस क्वारंटाईन करण्यासाठी एनटीपीसीआर चाचणीचाच अहवाल मागत असल्याने यावर्षी त्यांच्यासाठी ती विघ्नाचीच वार्ता आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

गणेशोत्सवासाठी पुणे, मुंबई, गोवा व अन्य ठिकाणाहून 12 तारखेनंतर येणाऱ्यांसाठी प्रवासाआधी 48 तास कोविड 19चा अहवाल निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे; मात्र कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसत नसल्यास गोव्यातील सरकारी व खासगी प्रयोगशाळेत एनटी पीसीआर चाचणी केली जात नाही. त्याऐवजी अँटीजेन चाचणी केली जाते.

त्या चाचणीचा अहवाल ताबडतोब मिळतो आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळते. त्यात जर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली तरच एनटीपीसीआर चाचणी केली जाते, जी विश्‍वासार्ह मानली जाते. असे असले तरी गोव्यातील लक्षणे नसलेल्या तरुण तरुणींची एनटीपीसीआर चाचणीस गोव्यातील प्रयोगशाळा तयार नाहीत. अँटीजेन चाचणी गोव्यात ग्राह्य धरत असले तरी ती सिंधुदुर्गात ग्राह्य धरली जात नसल्याने गोव्यातून जिल्ह्यात येणारे विचित्र कोंडीत अडकले आहेत.

घोटगेवाडी परिसरातील युवकांना त्याचा फटका गुरुवारी बसला. त्यांनी केलेली अँटीजेन चाचणी ग्राह्य न धरता त्यांना तीन दिवसांऐवजी दहा दिवस क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे गणपतीचा पहिला दिवस त्यांना मिळणार नाही. शिवाय आता यापुढे जे येतील त्यांच्याकडे एनटीपीसीआर चाचणीचा अहवाल नसेल तर त्यांनाही गणेशोत्सव साजरा करण्यात अडचणी येणार आहेत. 

अँटीजेन चाचणी ग्राह्य धरावी 
पोटापाण्यासाठी गोव्यात गेलेल्या युवक युवतींना गावी आल्यावर दहा किंवा चौदा दिवस आणि पुन्हा गोव्यात गेल्यावर चौदा दिवस क्वारंटाईन राहणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. अशी सुटी त्यांना मिळणार नाही, कदाचित त्यांना त्यांच्या नोकरीवर पाणी सोडावे लागेल. त्यामुळे एकतर अँटीजेन चाचणीचे अहवाल सिंधुदुर्ग प्रशासनाने मान्य करुन तीन दिवसांचाच कालावधी क्वारंटाईनसाठी ठेवावा, अशी मागणी युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस आणि घोटगेवाडी शाखाप्रमुख सागर कर्पे यांनी केली आहे. 

शासन निर्णयानुसार तीन दिवस क्वारंटाईन राहण्यासाठी एनटीपीसीआर चाचणीचाच अहवाल लागतो. अँटीजेन चाचणीचा अहवाल आणल्यास संबंधितांना दहा दिवसच क्वारंटाईन राहावे लागणार आहे. 
- रमेश कर्तसकर, तालुका आरोग्य अधिकारी, दोडामार्ग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com