विमा हप्ता भरणाऱ्या शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी

crop insurance for farmers paid within the date of 27th november in sindhudurg
crop insurance for farmers paid within the date of 27th november in sindhudurg

ओरोस (रत्नागिरी) : सध्याच्या बदलत्या हवामानाचा विचार करता आंबा-काजू पिकासाठी विमा संरक्षणाची शेतकर्‍यांना आवश्यकता आहे. हा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर असून शेवटचे तीन दिवस सुट्टी असल्याने शेतकर्‍यांना विमा हप्ता भरण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी 27 पूर्वी विमा हप्ता भरावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजनेंतर्गत कोकणातील आंबा व काजू या दोन प्रमुख पिकांचा समावेश होतो. गेल्या चार ते पाच वर्षात हवामानातील बदलामुळे उत्पादनात विपरीत परिणाम होत आहे; मात्र फळ पिक विमा योजनेमुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनास काही अंशी मदत होते. राज्य शासनाने 5 जून 2020 अन्वये चालू वर्षीसाठी हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना जाहीर करताना काही निकषांमध्ये बदल केला आहे. 

चालू वर्षी निकषांमध्ये करण्यात आलेले बदल हे आंबा उत्पादक शेतकर्‍यांवर अन्यायकारक असल्याने त्यात बदल होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले आहेत. संबंधित विषय हा केंद्र शासनाशी निगडीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संचालक व्हिक्टर डान्टस व विकास सावंत यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर या विषयानुषंगाने सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे खास सभा आयोजित करण्यात आली. या सभेत फळ पिक योजनेबाबत संबंधित अधिकार्‍यांनी सविस्तर माहिती दिली.

चालू वर्षापासून केंद्राने पिक विमा योजना शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक केली असून आपला विमा हप्त्यातील सहभाग मर्यादित केला आहे. योजनेतील सध्याच्या निविदा रद्द करण्याबाबत राज्य शासनाने केंद्राकडे विनंती केली आहे. मात्र त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. हवामानातील निकष हे आंबा पिकाबरोबरच केळी पिकासाठीही अडचणीचे असून राज्य शासन यासाठी स्वतंत्र विमा निकष योजना राबविण्याच्या विचाराधिन असून त्यादृष्टीने राज्य शासनाचे काम सुरू आहे. परंतु त्याला काही कालावधी लागणार आहे. मात्र चालू वर्षी शासनाकडील सुधारीत निकषांनुसार अवेळी पाऊस 1 एप्रिल ते 15 मे या कालावधीत 25 मिलीमीटर व 1 मार्च ते 15 मे या कालावधीत 37 डिग्रीपेक्षा जास्त तापमान विचारात घेऊन विमा योजनेत शेतकर्‍यांना सहभागी व्हावे लागणार आहे. 

सध्याच्या बदलत्या हवामानाचा विचार करता आंबा काजू पिकासाठी विमा संरक्षणाची शेतकर्‍यांना फार आवश्यकता आहे. कर्जदार शेतकर्‍यांनी कलम बाग असलेल्या ठिकाणचा जिओ टॅगिंग फोटो मागाहून दिल्यास चालू शकेल. विमा हप्ता भरण्याची 30 नोव्हेंबर अंतिम तारीख असून शेवटचे तीन दिवस सुट्टी असल्याने शेतकर्‍यांनी 27 नोव्हेंबरपूर्वी विमा हप्ता भरावा, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सावंत यांनी केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com