पावसामुळे आंब्याची झालेली गळ.
पावसामुळे आंब्याची झालेली गळ.Sakal

रत्नागिरी : वातावरणातील बदलामुळे हापूस काढणीस विलंब

पावसाचा परिणाम; बागायतदारांना धास्ती, वेगवान वारेही

रत्नागिरी - हवामान विभागाचा अंदाज योग्य ठरत आज रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुखमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेले दोन दिवस सलग जिल्ह्यात पाऊस पडत आहे. वेगवान वाऱ्‍यामुळे आणि अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत; तर पावसामुळे हापूसची काढणी एक दिवस लांबणीवर गेली आहे. रविवारी पहाटेपासून आभाळ भरुन आले होते. सकाळी सहाच्या सुमारास अचानक वारे वहायला सुरवात झाली आणि जोरदार पावसाच्या सरी पडू लागल्या. रत्नागिरी शहराजवळील एमआयडीसी, मारुती मंदिर परिसरात मध्यम पाऊस झाला. वर्षभर बाजूला पडलेल्या छत्र्या व रेनकोट घेऊन नागरिक बाहेर पडू लागले. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्‍यांचा हिरमोड झाला. अनेकांना बाहेर पडताच आले नाही; मात्र दुचाकी घेऊन फिरण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांनी मात्र पावसाची तमा न बाळगता आनंद घेतला. शहरातील काही भागात पावसाचे पाणी साचून राहिले होते. दोन तासानंतर पाऊस पूर्णतः थांबला होता. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. दुपारी सूर्यदर्शन झाले आणि कडकडीत उन पडले. सकाळच्या सत्रात पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा होता. देवरूख परिसरातही पावसाच्या जोरदार सरी पडल्या. सलग दोन दिवस तिथे पाऊस कोसळत आहे. त्याचा परिणाम निश्‍चित या परिसरातील आंबा बागायतींवर होणार आहे.

रत्नागिरी तालुक्यात सगळीकडेच हलका पाऊस पडला. विजांच्या कडकडाटामुळे ग्रामीण भागातील विजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस जास्तकाळ पडत न राहील्यामुळे बागायतदारांची चिंता थोडी कमी झाली आहे. सतत पाऊस पडत राहिला, तर मोठ्या प्रमाणात फळगळ झाली असती; परंतु पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती बागायतदारांना सतावत आहे. आंबा काळा पडून दर्जावर परिणाम होतो. आंबा तयार होऊ लागला असून पावसामुळे एक दिवसाची काढणी थांबवावी लागली आहे.

पानावर बुरशी आलेली असेल..

सध्या वाशी बाजारातील दर कमी झाल्यामुळे बागायतदारांना फटका बसत आहे. दोन दिवसांत सर्वच बागायतदार एकाचवेळी आंबा काढणीसाठी घाई करतील. एकाचवेळी मोठ्याप्रमाणात पेटी बाजारात गेली की, त्याचा दरावर परिणाम होईल. सध्याच्या पावसामुळे फळाचा आकार वाढेल आणि काढणीसाठी लवकर तयार होण्यास मदत होईल; परंतु ज्या ठिकाणी पानावर बुरशी आलेली असेल, ती फळावर उतरण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत.

अजून दोन दिवस पाऊस

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार २५ व २६ एप्रिलपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्‍यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील तीन दिवसात जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. गारांच्या पाऊसही झाला. अजुन दोन दिवस पावसाचे संकट बागायतदारांवर राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com