चाकरमान्यांनी केली गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी...

Demand to CM to release Konkan trains for Ganeshotsav
Demand to CM to release Konkan trains for Ganeshotsav

रत्नागिरी : गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य शासनाने कोकण रेल्वेमार्गावर गाड्या सोडाव्यात यासाठी  केंद्र सरकारकडे प्रयत्न करावे , असे निवेदन मुंबईतील चाकरमान्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

 कोकणातील चाकरमान्यांच्या वतीने जयेश नारायण वालावलकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की,  गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण आहे. लाखो गणेशभक्त सणानिमित्त महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आपपल्या गावी कोकणात पोहोचतात. त्यात मुंबई, पुण्यातून गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते..

करोनाचा प्रभाव आणि सरकारने सुरू केलेली अनलॉक प्रक्रिया लक्षात घेता राज्य सरकारने लवकरात लवकर रेल्वेची वाहतूक सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत. लॉकडाउन काळात बंद झालेली १२० दिवसांची आरक्षण व्यवस्था ३१ मेपासून सुरू करण्यात आली होती. तरीही आंतरजिल्हा प्रवासबंदीचे कारण देत पुढील चार महिन्यांनंतरचेही आरक्षण राज्यातील प्रवाशांना उपलब्ध होत नसल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सामान्य माणसाने मुंबई-सावंतवाडी असा प्रवास ४ प्रवासी क्षमता असलेल्या खासगी गाडीने करायचा विचार केला तर २० हजार ते २५ हजार रुपये भाडे सांगितले जात आहे. त्या ४ जणांमध्ये हे भाडे विभाजित केले, तरी प्रति व्यक्तीला साडेपाच हजार आणि परती धरून ११ हजार रुपये खर्च होऊ शकतो. ते दर सर्वसामान्य, गरीब चाकरमान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळेच फक्त ऐपत असलेलेच प्रवास करू शकतील. त्यांनी प्रवास करावा, असे राज्य सरकारला सुचवायचे आहे का असा प्रश्न आज सर्वसामान्य चाकरमान्यांना पडला आहे.

 जूनपासून ज्या स्पेशल ट्रेन रेल्वेमार्फत सोडल्या गेल्या, त्यापैकी नेत्रावती एक्स्प्रेस आणि मंगला एक्स्प्रेस या दोन गाड्या कोकणातून जातात. पण राज्य सरकारने रेल्वेला महाराष्ट्रातील स्थानकांचे तिकीट देऊ नये असे, सुचविले आहे. त्यामूळे रेल्वेने या स्थानकांचे आरक्षण देणे बंद केले आहे. गणेशोत्सवातही कोकणात रेल्वेगाड्या थांबल्या नाहीत, तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो, हे राज्य सरकारने ध्यानात घेऊन पुढील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. ज्या प्रकारे सरकारने बाहेरील राज्यातील विस्थापितांना त्यांच्या मूळगावी सुखरूप पोहोचवले त्याचप्रकारे सर्व सुरक्षेच्या बाबींची पडताळणी करून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com