
रोजगारासाठी नाणार रिफायनरी व आयलॉग प्रकल्प व्हावेत, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय देवाचे-गोठणे, सागवे आणि राजापूर बाजारपेठेतील व्यापारी संघटना, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने बैठकीत घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'ही' भूमिका ऐकूण घेणार काय...?
राजापूर - तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगारासाठी नाणार रिफायनरी व आयलॉग प्रकल्प व्हावेत, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय देवाचे-गोठणे, सागवे आणि राजापूर बाजारपेठेतील व्यापारी संघटना, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने बैठकीत घेतला. या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत.
राजापूर तालुक्यात कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, राजापूर शहरातील व्यापारी, नागरिक यांच्यासह सागवे, देवाचे गोठणे विभागातील शिवसेना पदाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत मंगळवारी (ता.१८) सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. राजापूर तालुकाच नव्हे, तर संपूर्ण कोकणच्या विकासासाठी ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या प्रकल्पाबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधून प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर होणारे परिवर्तन याची कल्पना येते. कोकणात अशा प्रकल्पाद्वारे स्थानिकांना रोजगार मिळणार असेल तर ते पाहिले पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार गणपत कदम यांनी
या बैठकीत मांडली. या प्रकल्पांना आमचे समर्थन असून, कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रकल्पांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि हे प्रकल्प मार्गी लावावेत, असे मत विलास पेडणेकर यांनी मांडले.
रिफायनरी आणि आयलॉग प्रकल्पांबाबत बाहेरची मंडळी आणि एनजीओ गैरसमज पसरवत आहेत. शिवसेनेसह अनेकांचा प्रकल्पांना पाठिंबा आहे. प्रकल्पांना विरोध करणे एनजीओंचा व्यवसाय आहे. कोकणच्या विकासाला रोखण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही.
- पंढरीनाथ आंबेरकर, अध्यक्ष, जनकल्याण प्रतिष्ठानरोजगार नसल्याने तरुण मुंबई, पुण्याकडे जातो. बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होत आहे. कोणत्याही भागात होणारी औद्योगिक क्रांती ही त्या भागातील विकासाची नांदी आहे.
- विलास पेडणेकर, सचिव, व्यापारी संघ, राजापूर