
मी जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईन, त्याच्या पाठीशी शहरातील जनतेने उभे राहणे गरजेचे आहे, असे आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आता माझी मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता नाही आणि त्यासाठी मी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या संधीचा फायदा व दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दाखवली आहे. मी नगराध्यक्ष नसलो तरी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईन, त्याच्या पाठीशी शहरातील जनतेने उभे राहणे गरजेचे आहे, असे आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केसरकर म्हणाले, 'सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन मंडळ, शासन स्तरावरून निधी दिला. त्याची नुकतीच उद्घाटने झालेली आहेत. येथील पालिकेला जिल्हा नियोजनमधून निधी दिला त्याचे श्रेय दुसरे लोक घेत आहेत; मात्र सावंतवाडीकर जनतेला माहिती आहे. मी नगराध्यक्ष असो किंवा नसो शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
ते म्हणाले, 'शहरवासियांना चोवीस तास पाणी मिळावे, म्हणून 46 कोटीची योजना प्रस्तावित आहे. त्या योजनेचा पाठपुरावा केला आहे. अन्य कोणी पाठपुरावा केला असेल तर तसे पत्र दाखवावे. शहराच्या विकासासाठी सतत निधी दिलेला आहे. आम्हीच केलं असे म्हणणाऱ्यांनी नळपाणी योजनेसाठी एक तरी प्रत पत्र दिले असेल तर दाखवावे.'
हेही वाचा - आंबा प्रेमींसाठी खुशखबर; राज्य चाखणार आता हापूसची चव -
पुढे ते म्हणाले, 'येथील संत गाडगेबाबा मंडईसाठी पाच कोटींचा रुपयांचा निधी खर्च झाला नसल्याने तो परत गेला आहे. जिल्हा नियोजन मंडळ आणि शासनस्तरावरून साडेसात कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्हा नगरोत्थानमधून अडीच कोटी रुपये मंजूर झाले असून पाच कोटी रूपये नगरविकास खात्याकडून मंजूर होणार आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये प्रकल्प आणणे, वाफोली येथील प्रकल्प सुरू करणे आणि सावंतवाडी येथील सेटबॉक्स निर्माण करणाऱ्या प्रकल्प सुरू करण्यावर माझा भर असेल.'
चांदा ते बांदा योजनेमुळे भाताचे उत्पादन वाढले आहे. असे चांगले नियोजन केल्यानंतर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. ती संधी साधून सिंधुदुर्गच्या विकासासाठी पुढील काळामध्ये आपले प्रयत्न राहतील. कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. आता तरी कोरोना संकटाला सामोरे जाताना राजकारण आणि थट्टामस्करी थांबवली पाहिजे, असेही केसरकर यांनी सांगितले.