रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारांना यंदाची दिवाळी गोड होणार आहे. या दिवाळीला एकनाथ शिंदे सरकारने १०० रुपयांत शिधा वस्तूंचे पॅकेज जाहीर केले आहे. यात रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेलाचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन लाख ७५ हजार कार्डधारकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी हे शिधा पॅकेज जाहीर केले असून त्याचे वितरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजदार ८५७ लाभार्थी शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाख घेत आहेत. यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ३८ हजार ७०० आहे; तर प्राधान्य गटातील लाभार्थ्यांची संख्या दोन लाख ३७ हजार आहे. शासनान ४ ऑक्टोबरला १०० रुपयांत चार वस्तू दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजार कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल अशा त्या वस्तू असून, प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात त्या मिळणार आहेत. शासनाकडून ही दिवाळी भेट असल्याने चारही वस्तू एकत्रिक पॅकबंद मिळणार आहेत. उद्या पासून या योजनेचे वितरण करण्याचे नियोजन आहे. मात्र, पुरवठा विभागाकडे अजून या वस्तू आलेल्या नाहीत.
फक्त साखरेचा साठा पुरवठा विभागाला आला आहे. उर्वरित वस्तू आल्यावर त्यांचा एकत्रित संच करून रेशन दुकानातून त्याचे वितरण होणार आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे त्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दुकानांमध्ये २० ऑक्टोबरनंतर हे वितरण होणार आहे. पॉस मशिनद्वारेच या एकत्रिक शिधा वस्तूंचे वितरण होईल.
लाभार्थ्यांची आकडेवारी
मंडणगड १३,८८९
दापोली २९,९३९
खेड ३०,६६७
गुहागर २०,८३६
चिपळूण ४४,९९९
संगमेश्वर ३५,४५२
रत्नागिरी ५१,८५६
लांजा १८,५७७
राजापूर २९,६३७
एकूण २,७५,८५६
जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ८७५ लाभार्थी आहेत. तेवढ्या पॅकिंगची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, सध्या साखर आली असून, उर्वरित वस्तू मिळाल्यावर दुकानदार एकत्रितरीत्या त्याचे वितरण १०० रुपयांत करणार आहेत.
- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी