चिपळूण ( रत्नागिरी ) - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल ब्रिटिशकाळातील आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी कित्येक वर्षात एक रुपयाही खर्च झालेला नाही. असे असताना त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर खर्च मात्र केला जात आहे. पोस्टमार्टेम केल्यानंतर मेलेला माणूस जिवंत होतो का, असा सवाल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गचे उपविभागीय अधिकारी कार्यालयात शाखा अभियंता आर. आर. मराठे यांची भेट घेतली. यावेळी चर्चेत पुलांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सरकार केवळ स्ट्रक्चरल ऑडिटवर पैसा कशासाठी खर्च करत आहे असा सवाल केला. या पुलाची क्षमताच संपुष्टात आल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. पुलाच्या चाचणीवर खर्च करण्यापेक्षा त्याच्या दुरूस्तीवर सरकारने भर द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान तपासणीसाठी पूल वाहतुकीस आजही बंद राहिल्याने दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती. अवजड वाहने महामार्गावरच उभी केली होती. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस कर्मचारी महामार्गावर लक्ष ठेवून होते. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे कमकुवत झालेला हा पूल हलतो.
पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले तरी ते बुजवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पावसाळ्यात पुलावर खड्ड्यामुळे दुचाकींचे अपघातही झाले आहेत. पर्यायी नव्या पुलाचे काम सध्या बंदच आहे. गेल्या तीन वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. या कामाला गती नाही ही बाबही पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणली. माजी सभापती शौकत मुकादम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, माजी सरपंच विकास गमरे आदी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.