तरुणाईस अमली पदार्थांचा विळखा; कर्नाटक, केरळतून येतात अमली पदार्थ

वर्षात जिल्ह्यात २० गुन्हे उघड; २० लाखांचे अमली पदार्थ, साहित्य जप्त
Drugs
Drugs

रत्नागिरी : जिल्ह्यालाही अमली पदार्थांचा विळखा पडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीहून केरळला जाणाऱ्या दोघा संशयितांकडून सुमारे साडेचार लाखाची एमडी पावडर जप्त करण्यात आली होती. यापूर्वी ग्रामीण पोलिसांनी एमआयडीसीमध्ये छापा टाकून अमली पदार्थांच्या पावडरीचा साठा जप्त केला होता. कोणत्या न कोणत्या कारणाने जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीशी कनेक्शन असल्याचे वारंवार पुढे येत आहे; मात्र तपासाला मर्यादा आल्याने कोणत्याही प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात अमली पदार्थांचे २० गुन्हे उघडकीस आले असून यातून सुमारे २० लाखाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी २८ जणांना अटक करण्यात आली आहे.

कर्नाटक, केरळ, बेळगावातून येतात अमली पदार्थ

जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधी कारवायांमुळे वाढता विळखा ही गंभीर बाब असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पूर्वीपासूनच अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे पोलिस कारवाईत उघड झाले आहे. एकदा तर शहर पोलिसांनी गांजाची तीन ते चार पोती जप्त केली आहेत. काही कॉलेज तरुणांसह अनेकजण नशा येण्यासाठी गांजाचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले. त्याची मागणी वाढल्याने पुरवठाही वाढला. जिल्ह्यात आजही गांजा, चरस, टर्की पावडर आदींची छोट्या-मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली. कर्नाटक, केरळ, बेळगाव, सांगली आदी भागांतून हे अमली पदार्थ येत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले.

डीवायएसपींच्या कारवाईचा झाला होता परिणाम

शहरातील बैलबागेसह एमआयडीसी, काही टपऱ्या, पडक्या इमारती, पूल आदी निर्जन ठिकाणी गर्दुले नशेसाठी वेगवेगळे अमली पदार्थांचे सेवन करतात. छोट्या-छोट्या पुड्यांमधून अमली पदार्थांची विक्री होत असल्याची चर्चा आहे. कोल्हापुरातून आलेल्या वडापच्या गाडीमध्ये पोलिसांनी गांजा पकडला आहे. पोलिस ठाण्याच्या जवळपास अमली पदार्थांचा साठा आणि विक्री होत असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. त्यामुळे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी अमली पदार्थाविरोधी मोहीमच आखली होती.

त्याचा काहीसा परिणाम होऊन याला काहीसा आळा बसला होता; परंतु आता पुन्हा याची राजरोस तस्करी आणि विक्री सुरू आहे. उच्च प्रतीच्या एमडी पावडरीचीही तस्करी करताना दोघा संशयितांना रत्नागिरीत पकडल्यानंतर ते अधोरेखित होत आहे.काही वर्षांपूर्वी स्थानिक गु्न्हे शाखेच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी एमआयडीसीमध्ये अमली पदार्थांची मोठी कारवाई केली होती. आंतरराष्ट्रीय टोळीशी त्याचे कनेक्शन लावले जात होते.

केले होते स्टिंग ऑपरेशन

रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात गांजा, चरस आदीच्या विक्रीबाबत एका खासगी वृत्तवाहिने स्टींग ऑपरेशन केले होते. त्यामध्ये अमली पदार्थांच्या छोट्या-छोट्या पुड्यांची विक्री केली जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर अमली पदार्थांचा हा बाजार सुरू होता.

नशिल्या औषधांसाठी रिव्हॉल्व्हरचा धाक

गर्दुले गांजा, चरस, टर्की पावडर न मिळाल्यास सैरभैर होऊन कफसिरप, अन्य औषध घेऊन नशा करू लागले. काही गर्दुले डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ही औषध मागू लागले. ती देण्यास विरोध करणाऱ्या दुकानदारांबरोबर वाद घालू लागले. सिव्हिलजवळच्या एका व्यावसायिकावर तर काही गर्दुल्यांनी रिव्हॉल्व्हर रोखले होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com