शेतकरी चिंतेत ; चाऱ्याचा प्रश्‍न झालाय गंभीर !

dry grass for animals it problematic to farmers for this year due to heavy rain in ratnagiri
dry grass for animals it problematic to farmers for this year due to heavy rain in ratnagiri

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. एकीकडे भाताला कोंब आले असताना सतत पाण्याखाली राहिल्याने गवतही कुजून गेले. त्यामुळे यंदा सुक्‍या चाऱ्याचा (गवत) प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे.

जिल्ह्यात गवताला मोठी मागणी असते. भाताबरोबरच गवतातूनही शेतकरी चांगला नफा मिळवतो. त्यामुळे भात पिकासोबतच शेतकरी वर्ग गवताचीही तेवढीच काळजी घेतो. पावसाळ्यात, उन्हाळ्यातही गुरांची याच गवतावर गुजराण केली जाते. त्यामुळे भाताबरोरच गवतासाठीही शेतकरी तितकीच मेहनत घेतो. 
भात लागवड करताना शेतकरी चांगले वाढणारे भात बी निवडत असतो. जेणेकरुन गवत जास्त मिळणार याचा विचार तो करतो; मात्र यावर्षी गवताचा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहणार असून मोठी नुकसानीही सोसावी लागणार आहे.

यावर्षी परतीचा पाऊस अद्याप शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही आहे. यावर्षी अधुन मधुन जाणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांनी कापून घातलेल्या भात पिकांची नासाडी केली. शेतात कापलेल्या भातात तसेच पावसाचे पाणी तुंबून राहिल्याने भाताला कोंब आलेच; पण गवतही कुजल्याने ते फेकून देण्यापलीकडे काहीच पर्याय राहीला नाही. पाण्यात राहिलेले गवत काळे पडले असून त्याला विचित्र वास येत असल्याने गुरे ते खाणारही नाही.

जिल्ह्यात सर्वत्र हीच परिस्थिती भात झोडणी केलेले गवतही पाण्याखाली आल्याने ते कुजून गेले आहे. रोज पावसाचे सजावट आणि दमट वातावरण असल्याने कापलेले व भात झोडणी केलेले गवत वाळत घालता येत नाही. जर का वाळत घातले तर रात्री पावसामुळे ते पुन्हा भिजण्याची भीती आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे चारही बाजूंनी नुकसान झाले आहे. 

भरपाई मिळावी 

गेल्या वर्षी तालुक्‍यातील सह्याद्री पट्ट्यातील शेतकरी वर्गाची गवताची पावसामुळे झालेली नुकसानी पाहता पहिल्यांदाच गवतासाठी भरपाई मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तहसीलदारांना निवेदनही त्यांनी दिले होते. यंदा शेतकऱ्यांमधून भरपाईची मागणी होत आहे. सरकारनेही तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 


मोठी किंमत मोजावी लागणार

जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यासह अनेक गावांत दुधाचा व्यवसाय मोठा आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात एकतरी म्हैस असतेच. दुधासाठी ओल्या चाऱ्याबरोबर सुके गवतही महत्त्वाचे असते. त्यामुळे गवळी लोक गवत मोठ्या प्रमाणात विकत घेतात. शिवाय, शेतकरी आपणासाठी गवताची बेगमी करून ठेवतो. मात्र, यंदा कुजलेले गवत व येणारा तुटवडा लक्षात घेता शेतकऱ्यांना गवतासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com