मोर्लेत टस्कराचा शेतकऱ्यावर हल्ला 

elephant attack farmers injured morle sindhudurg
elephant attack farmers injured morle sindhudurg

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - टस्कराच्या हल्ल्यात मोर्ले येथील शेतकरी गंभीर जखमी झाला. विश्‍वनाथ बाबी सुतार असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सव्वापाचच्या दरम्यान घडली. त्यानंतर हत्तींचा कळप सोनावल परिसराकडे सरकला आहे. त्याने तेथे नुकसानसत्र सुरू केले आहे. जिल्ह्यात हत्तींचा उपद्रव पूर्वीच्या तुलनेत कमी झाला; मात्र दोडामार्ग तालुक्‍यात वावर कायम आहे. तिलारी खोऱ्यात हत्तींचे वास्तव्य असते. काही दिवस ते बांबर्डे, घाटीवडे भागात होते. 

श्री. सुतार बागेत काजू गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानकपणे समोर येऊन टस्कर उभा राहिला. त्याला बघून ते पळत असताना टस्कराने त्यांना उचलून फेकून दिले. त्यावेळी ते जीवाच्या आकांताने ओरडले. त्यामुळे बाजूच्या बागेतील सुनील गवस, अंकुश चिरमुरे, बाळकृष्ण धुमास्कर धावत आले. त्यानंतर टस्कर पळून गेला. तिघांनी त्यांना उचलून गावात आणले. पोलिस पाटील तुकाराम चिरमुरे, अजित गवस, कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये, विश्राम गवस आदींनी खासगी गाडीतून येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांनी उपचार केले. नंतर त्यांना बांबोळी गोवा येथील गोमेकॉ रुग्णालयात पाठविण्यात आले. 

टस्कर पहाटे सोनावल येथे आला. तेथून तो पाळये मार्गे मोर्लेत पोचला. दरवर्षी तो त्या परिसरात येतो. दोन वर्षांपूर्वी त्याने मोर्लेत असाच एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता. आता पुन्हा एकदा त्या टस्कराने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, वनकर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात येत जखमी सुतार यांची भेट घेतली. शिवसेनेचे तालुका संघटक संजय गवस यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जखमीची विचारपूस केली. 

दरम्यान, तिलारी खोऱ्यातील बांबर्डे, घाटीवडे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींनी आता आपला मोर्चा सोनावलकडे वळवला आहे. त्या मार्गाने हत्तींची ये-जा अधूनमधून सुरू असते. सध्या त्यांच्याकडून वायंगणी भातशेतीचे नुकसान सुरू आहे. 
सोनावल परिसरात आज सकाळी साडेपाचच्या सुमारास हत्तीनी भातशेतीचे नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये शिवराम गवस, धोंडी गावडे, सुभाष देसाई, राजश्री गावडे आदीचा समावेश आहे. भातपीक आणि अन्य पिकांसह केळी, नारळ, सुपारीच्या बागांचे हत्तींकडून नुकसान होत असल्याने शेतकरी भीतीच्या छायेत आहेत. 

कामगारांच्या सुरक्षेचे काय? 
मोर्ले पारगड रस्त्याच्या कामासाठी अनेक मजूर कुटुंबे आली आहेत. त्यांनी त्या रस्त्यालगत जंगलभागात झोपड्या उभारल्या आहेत. त्यात छोटी मुलेही आहेत. टस्कराकडून त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे उपाययोजनेची मागणी पोलिस पाटील गवस यांनी केली आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com