काजू पीक देखील आता बेभरवाशाचे, काय आहेत कारणे? वाचा....

environmental impact on cashew farm konkan sindhudurg
environmental impact on cashew farm konkan sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या तीन चार वर्षात सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाचा काजू बागांवर मोठा विपरित परिणाम झाला. अतिवृष्टी, ढगाळ वातावरण, वादळीवारे यामुळे काजू पीकांवर मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. किडरोग आटोक्‍यात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कीटकनाशकाच्या फवारण्या, वाढलेला मजुरी खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ न बसणारा आहे. त्यामुळे कधीकाळ हमखास पीक देणारे काजू पीक देखील आता बेभरवाशाचे झाले आहे. 

जिल्ह्यात हमखास फळपीक म्हणून काजूकडे पाहिले जाते. त्याचमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा काजू लागवडीकडील मागील दहा वर्षांत कल वाढला. दरवर्षी 5 हजार हेक्‍टर क्षेत्र काजू लागवडीखाली येत आहे; परंतु दोन-तीन वर्षांत सतत बदलत असलेल्या वातावरणाचा मोठा फटका काजू बागांना बसला. सलग दोन वर्षे जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काजू बागांमधील पाण्याचा निचरा होत नाही.

उताराच्या लागवडीवर तितकासा परिणाम होत असला तरी लागवड केलेल्या सपाट जमिनीत पाणी साचून राहते. यामुळे विविध कीड रोग बागांमध्ये निर्माण होतात. टी मॉस्कीटो, फांदीमर, शेंडेमर, पानगळ अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळा असल्यामुळे कीडरोग नियत्रंणासाठी कीडरोग प्रतिबंधात्मक फवारण्यादेखील शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे या सर्वांपुढे हतबल ठरतो. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत तर अनेक शेतकऱ्यांच्या दहा ते पंधरा वर्षाच्या काजू बागा उद्‌ध्वस्त झाल्या. 

अतिवृष्टीप्रमाणेच दोन-तीन वर्षांत हिवाळा आणि उन्हाळ्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याचे चित्र आहे. काजूला साधारणपणे ऑक्‍टोबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापासून पालवी तर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मोहोर येण्याची प्रकिया सुरू होते. मोहोर आल्यानंतर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस पडल्यास काजू पीकावर मोठा परिणाम होतो.

गेली दोन तीन वर्षे तर वातावरणातील बदलांमुळे त्रस्त आहेत. अशा वातावरणाविरोधात सुद्धा अनेक शेतकरी तितक्‍याच ताकदीने बागांमध्ये राबतात. अनेक फवारण्या घेतात; मात्र कीटकनाशकांच्या वाढलेल्या किंमती आणि काजू पिकातून मिळणारे उत्पादनाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे काजू बागायतदार गेल्या दोन तीन वर्षात सातत्याने समस्याच्या गर्तेतून प्रवास करीत आहेत. 

अलीकडील काळात काजूकरीता पीक विमा योजना शासनाने सुरू केली; परंतु काजूचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना पीक विमा सरंक्षित केलेल्या क्षेत्राची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यावर्षी सह्याद्री पट्ट्यातील काजू बागांचे वादळाने मोठे नुकसान केले; परंतु अद्याप कुणालाही भरपाई मिळालेली नाही. चक्रीवादळ, किंवा वादळाने अनेक काजू बागांचे नुकसान होते. जीवापाड देखभाल केलेली झाडे उन्मळून पडली; परंतु त्यांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही. काजू पीक विम्यात झाडाला संरक्षित करण्याची तरतुद असणे आवश्‍यक आहे. 

सहा एकरात काजू लागवड केली आहे. पहिल्या टप्प्यात लावलेली रोपे आता उत्पादन देत आहेत; परंतु बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम उत्पादनावर होत आहे. गेल्यावर्षी लांबलेला पाऊस, त्यानंतर क्‍यार वादळ आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे काजू पिकाचे मोठे नुकसान झाले. 
- प्रकाश पांचाळ, काजू बागायतदार, कोकिसरे 

विमा योजनेत बदल हवा 
हवामानावर आधारीत सुरू करण्यात आलेली फळपीक विमा योजनेचा काजू पिकाकरीता कालावधी हा डिसेंबर ते फेब्रुवारी असा आहे; परंतु जिल्ह्यात कलम काजूचे उत्पादन 15 मार्चपर्यंत सुरू असते. या कालावधीत पाऊस,वादळ झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे डिसेंबर ते मार्च असा कालावधी असणे आवश्‍यक आहे. 

वणवे बाधितांना आधाराची गरज 
पाच दहा वर्षे सांभाळलेली काजू बाग एखाद्या वणव्यात भस्मसात होते. त्यावेळी तो शेतकरी कोलमडुन जातो. अशा वणवे बाधित शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने एखादी योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वणवे बाधितांना मदत दिली जाते. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com