एक जूनपासून बंदी; पापलेट, सुरमई कडाडली
रत्नागिरी - मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पाच दिवसांनंतर म्हणजे 1 जूनला मासेमारीबंदी लागू होईल. सध्या 90 टक्के मच्छीमारी नौका सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढून शाकारून किंवा बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी, मत्स्य उत्पादन थांबल्याने माशांचे दर वधारले आहेत. मार्केटमध्ये 1 जूनला मासेमारीबंदी लागू होणार असून, पापलेट व सुरमईच्या आकारावरून त्याचा नऊशे ते हजार रुपये किलो एवढा भाव झाला आहे. त्यामुळे खवय्यांची चांगलीच पंचाईत झालेली दिसते.
कोकणचे मासेमारी हे मुख्य उत्पादनाचे साधन असल्याने दर्जेदार मासे खाण्यामध्ये कोकणी माणूस माहीर आहे. परंतु, मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासून वातावरणातील बिघाड, सोसाट्याचा वारा, परराज्यांतील मच्छीमारांची बेकायदा घुसखोरी, एलईडी मासेमारी, पारपंरिक आणि पर्ससीन मासेमारीतील वाद आदी कारणांमुळे मच्छीमारांना हंगामाचा पुरेसा फायदा उठविता आला नसल्याचे सांगण्यात येते. त्यात ट्रिगर फिशच्या आक्रमणाने दर्जेदार मासळी खोल समुद्रात गेली आहे. डिझेल, खलाश्यांचा खर्च, मेहनत आदीचा खर्चच निघेना, एवढी गंभीर परिस्थिती असल्याचे मच्छीमारांचे मत आहे. अनेक फेऱ्या मारल्या, तर एखादा रिपोर्ट (मासे मिळतात) मिळतो. आतातर मासेमारीबंदी लागू होणार आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार 1 जून ते 31 जुलै 2019 या 61 दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना बंद घालण्यात आली आहे. सुरमई, पापलेटचा किलोचा दर 500 रुपये होता; तो आता सातशेवर गेला आहे. मार्केटला हाच दर त्यापेक्षाही अधिक आहे. सुरमई, पापलेटचा दर 900 ते हजार रुपये आहे.
मासळी उत्पादनात घट; निर्यात निम्म्यावर
पर्ससीन मासेमारीवर लागू केलेले निर्बंध आणि परराज्यातील बोटींचे आक्रमण, यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पर्ससीनबंदीमुळे मत्स्य उत्पादनात मोठी घट झाली. याचा परिणाम पंचवीस ते तीस कोटींचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाल्याचे बोलले जाते. जिल्ह्याच्या मत्स्य उत्पादनातही मोठी घट झाली आहे. तसेच, परराज्यांतील ट्रॉलर्सचे अतिक्रमण आणि एलईडी साह्याने मासेमारी, यामुळे मत्स्त्योत्पादनात मोठी घट झाली आहे.
|