पर्जन्य अभिषेकात रत्नागिरीत "श्रीं'चे आगमन 

पर्जन्य अभिषेकात रत्नागिरीत "श्रीं'चे आगमन 

रत्नागिरी - वरुणराजाच्या संततधार अभिषेकात श्री गणरायाचे घराघरांत आगमन झाले. मंगलमय वातावरणात जिल्ह्यात एक लाख 66 हजार 587 खासगी, तर 110 सार्वजनिक ठिकाणी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. पावसाच्या सरी आज जोरदार पडत होत्या. सकाळी मुहूर्त पाहून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर घराघरांत "सुखकर्ता, दुःखहर्ता'चे सुर घुमू लागले. 

गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे आज सकाळी गणेशभक्‍तांची तारांबळ उडाली होती. मूर्तिशाळेतील गणेशमूर्ती लवकरात लवकर घरी आणण्यासाठी लगबग सुरू होती. मात्र, अनेकांना मुसळधार पावसातच गणराय घरी आणावे लागले. सकाळपासून गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी कसरत सुरू होती. अनेकांनी पावसापासून गणरायाची सुरक्षा करण्यासाठी प्लास्टिकचे कागद लावले होते. तरीही भक्‍तांच्या उत्साहाला पारावार उरलेला नव्हता.

भरपावसात ढोल-ताशे वाजवत तरुण भक्‍तगण मिरवणूक काढत होते. चारचाकी गाड्यांमधून छोट्या-मोठ्या बाप्पाच्या मूर्ती घरी नेण्यात येत होत्या. सरीवर पाऊस असल्याने उघडीप मिळाली की मिरवणूक सुरू होत होती. ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात घराघरांत आरत्यांचे सूर घुमत होते. 

खराब हवामान, वेगवान वाऱ्याची शक्‍यता 
मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी नौका बंदरात उभ्या करणे पसंत केले. लोखंडी बनावटीच्या सात ते आठ नौका समुद्रात गेल्या होत्या; परंतु खराब वातावरणामुळे त्या बंदरात माघारी परतल्या. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com