गणपतीपुळे किनारा होतोय सुरक्षित; वर्षभरात 25 जणांना वाचवले 

Ganpatipule shore is safe Rescued 25 people throughout the year
Ganpatipule shore is safe Rescued 25 people throughout the year

रत्नागिरी - तेरा वर्षांमध्ये 28 जणांचा बुडून मृत्यू झाल्याने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची ओळख धोकादायक म्हणून होती; मात्र ती आता पुसली जात असून सुरक्षित किनारा म्हणून नवी ओळख या किनाऱ्याला मिळत आहे. वर्षभरात ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या उपाययोजनेमुळे वर्षात आठ घटनांमध्ये सुमारे 25 जणांना वाचविण्यात यश आले. तर फक्त एकाचा बुडून मृत्यू झाला. पर्यटकांनी खबरदारी घेतल्यास देवदर्शनानंतर समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा आनंद त्यांना घेता येणार आहे. 

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचे काम विविध स्तरावर सुरू आहे. कोरोनानंतर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. पर्यटकांनी पर्यटनासाठी कोकणाला जास्त पसंती दिली आहे. त्यात देवदर्शन आणि समुद्रात डुंबण्याचा आनंद असा दुहेरी हेतू साध्य करण्यासाठी तालुक्‍यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्राला पर्यटकांची जास्त पसंती आहे.

येथे दिवसभरात सुमारे 10 हजारांहून अधिक पर्यटक हजेरी लावत आहेत. किनाऱ्यावर येणारे पर्यटक मौजमजेसाठी समुद्रात उतरतात. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांचा बुडून मृत्यू होतो. गेल्या 13 वर्षात गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर 28 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. त्यामुळे हा समुद्रकिनारा धोकादायक म्हणून ओळखला जात होता; मात्र येथे केलेल्या उपाययोजनांमुळे सरत्या वर्षात केवळ एकाच पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.

जयगड पोलिस, देवस्थान आणि ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा हा चांगला परिणाम आहे. पर्यटकांमध्ये जागृती करण्यासाठी गणपतीपुळेच्या प्रवेशद्वारावर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून धोकादायक स्थितीची माहिती कानावर पडते. पुढे किनाऱ्याकडे जाताना मोठ्या बॅनरद्वारे धोकादायक किनाऱ्याच्या माहितीसह बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या नजरेस पडते. किनाऱ्यावरील व्यावसायिकांच्या मदतीने बुडणाऱ्या पर्यटकांचे प्राण वाचविले जातात. पोलिसांची किनाऱ्यावर चोवीस तास गस्त ठेवली आहे. त्यामुळे खोल समुद्रात जाणाऱ्या पर्यटकांना रोखण्याचे काम ते करतात. 


गणपतीपुळे देवस्थान, ग्रामपंचायतीमार्फत जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांना ट्यूब, जॅकेट्‌स, दोरी, सर्च लाईट आदी साहित्य देण्यात आले आहेत. त्याचा वापर पर्यटकांना वाचविण्यासाठी केला जात आहे. पर्यटकांचा बुडून मृत्यू होऊ नये, याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घेतली. त्यासाठीचे मार्गदर्शन पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, सदाशिव वाघमारे, देसाई मॅडम आदी वरिष्ठांनी केले. 
- नितीन ढेरे, 
जयगड सहाय्यक पोलिस निरीक्षक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com