मरणासन्न बागेला `चांदा- बांदा`मुळे नवसंजीवनी

garden Help Chanda to Banda scheme
garden Help Chanda to Banda scheme

कळणे (सिंधुदुर्ग) - चांदा ते बांदा योजनेचा राजकीय वाद काहीही रंगू दे; पण आडाळी कोसमवाडीतील मरणासन्न असलेल्या नारळी-सुपारीच्या बागेला या योजनेमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतील योजनेतून येथील शेतपाटाला निधी मिळाला. लॉकडाउन काळात नोकरी गमावलेल्या तरुणांना शेतपाटाच्या बांधकामातून रोजगारही मिळाला. 

चांदा ते बांदा योजना गेली काही वर्षे अनेक कारणांनी चर्चेत आहे. या योजनेसाठी "मायक्रो प्लॅनिंग' हा शब्द प्रशासनात खुपच परवलीचा झाला होता. या सूक्ष्म नियोजनातूनच उपलब्ध नैसर्गिक साधनांचे उन्नयन करणे व रोजगार संधी वाढवणे हा योजनेचा उद्देश. आता जिल्ह्यात तो किती साध्य झाला ते सोडा; पण आडाळी ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर यांनी मात्र लघु सिंचनाच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करून मरणासन्न नारळ-सुपारीच्या बागेला नवसंजीवनी दिली आहे. आडाळी दडसखल बंधाऱ्याच्या पाण्यावर गेली 70 हून अधिक वर्षे आडाळी कोसमवाडी आणि फोंडिये येथील शेती-बागायती बहरत आली; पण गेली काही वर्षे अनेक कारणांमुळे शेती थांबली आणि बंधाऱ्याच्या पाण्याचा प्रवाहही थांबला.

शेतपाट नसल्याने तर गेल्या काही वर्षात बागायतीही उन्हाळ्यातील पाण्यापासून दुरावली. अखेर या प्रश्‍नावर उत्तर सापडले ते माजी पालकमंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतील चांदा ते बांदा योजनेत. या योजनेतून या शेतपाटासाठी निधी मंजूर झाला. ग्रामपंचायत सदस्य गावकर यांनी या कामाच्या मंजुरीसाठी मेहनत घेतली. सरपंच ऊल्का गावकर आणि ग्रामसेवक नम्रता राणे यांची त्यांना साथ मिळाली. लघु पाटबंधाराचे अभियंता वसंत मोहिते, उपअभियंता आदन्नवर यांनीही सकारत्मक भूमिका पार पाडली. त्यामुळे पक्का शेतपटाचे काम मार्गी लागले. 

स्थानिकांना रोजगार 
शासकीय योजनेतून जी विकास कामे केली जातात, त्याचा एक हेतू रोजगार निर्मिती असा असतो. त्यातून विकासकामांचा थेट फायदा स्थानिकांना मिळणे अपेक्षित असते; परंतु ही विकासकामे करणारे परप्रांतीय मजूर असतात असे चित्र आसपास दिसते; मात्र लॉकडाऊन काळात हे मजुर उपलब्ध नव्हते. स्थानिक स्तरावरही अनेकांचा रोजगार गेला. त्यावेळी गोव्यातील रोजगार गमावलेले उच्चशिक्षित तरुण व स्थानिक मजूर एकत्र येत शेतपाटाची कामं केली. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला. 

शेतकऱ्यांची श्रमदानातून कामे 
पक्का शेतपाट झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांनी श्रमदानातून बांधबंधिस्ती केली आणि पाटातून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. त्यामुळे गेली काही वर्षे उन्हाळ्यात पाण्याविना कोमेजून जाणाऱ्या बागायतीला आता नवसंजीवनी मिळाली आहे. कुशल नेतृत्वाने एखाद्या योजनेची अंमलबजावणी केल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन शास्वत विकासाची वाटही दृष्टीक्षेपात येते. याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com