सरपंचांविरोधात जावून कुठलाही निर्णय घेणार नाही, अशी कुठल्या पालकमंत्र्यांनी दिली ग्वाही

corona
corona

ओरोस : शांतता समितीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवासाठी सात दिवसांच्या क्वारंटाईनची मागणी केली होती. ही मागणी केली म्हणजे ती मान्य झाली, असे नाही.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांविरोधात जाऊन शासन कोणताही निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना आधी क्वारंटाईन करावे, त्याचा कालावधी याबाबत सिंधुदुर्ग सरपंच संघटनेने भूमिका घेतली आहे. त्याचा संदर्भ देवून श्री. सामंत म्हणाले, "जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीत सात दिवसांच्या क्वारंटाईनची मागणी करण्यात आली होती. बैठकीत करण्यात आलेल्या मागण्यांचे एकत्रीकरण करून शासनाला पाठविल्या आहेत. त्यात माझ्याही सूचना मी मांडल्या आहेत. यात ई-पास परवानगी अधिकार आयुक्त यांच्याकडे न देता पोलिस निरीक्षक यांना द्यावेत. त्यात सुलभता आणावी. मागेल त्याला पास मिळावा. खासगी वाहनातून येणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करावा. चाकरमान्यांना येण्या जाण्यासाठी एसटीची सुविधा करावी. त्यासाठी त्यांच्याकडून वाढीव तिकीट न घेता नियमित दर घ्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.'' 

ते म्हणाले, "सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आहे. येथील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के असून राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यात आपण आहोत. जिल्ह्यातील विरोधक कोरोनाकाळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बिघडली, असे आरोप करीत आहेत; पण तशी स्थिती नाही. कारण या काळात जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य संस्थेत एक लाख 933 रुग्णांची ओपीडी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात 96 हजार झाली आहे. दोन हजार 478 प्रसूती झाल्या आहेत. मोठ्या शस्त्रक्रिया 664 झाल्या आहेत.'' 

"त्या' टिप्पणीला अर्थ नाही 
गणेशोत्सव नियोजनासंदर्भात जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली होती. त्यावेळी करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. त्याची टिप्पणी करण्यात आली होती. ती टिप्पणी म्हणजे निर्णय नाही. ती रद्द करण्यात आली असून तिला आता अर्थ राहिलेला नाही. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची ती टिप्पणी रद्द झाली आहे, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. 

सण साधेपणाने साजरे करा 
गणेशोत्सवास येणाऱ्या चाकरमान्यांवर निर्बंध घातल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला होता. यावर मंत्री सामंत यांनी या आंदोलनाची गरज पडणार नाही, असे सांगितले. कोरोना आल्यापासून गेल्या चार महिन्यांत आपण सर्व सण साध्या पद्धतीत साजरे केले. तसेच गणेशोत्सव व बकरी ईद साजरे करावेत, असे आवाहन सामंत यांनी केले आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com