मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

highway of mumbai to goa work as stage of working said MP vinayak raut in press conference in sindhudurg
highway of mumbai to goa work as stage of working said MP vinayak raut in press conference in sindhudurg

सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, कुडाळ येथील विरोध मावळला आहे. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचे लवकरच लोकार्पण होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघातात जास्तीत जास्त लोक मृत्युमुखी पडत असल्याचे निरीक्षण नोंदवले असून त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी खासदारांच्या अध्यक्षतेखाली रस्ते सुरक्षा समिती नियुक्त केली आहे. या समितीची बैठक झाली. त्यानंतर राऊत म्हणाले, ‘‘दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरलोड वाहतूक याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांचे अवलोकन करून त्यांच्यावरील नियंत्रणाबाबतची देखरेख समितीकडून ठेवली जाते.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गतवर्षी अपघातात ५७ वाहनधारकांचा बळी गेला होता. या तुलनेत या वर्षी ३८ बळी गेले. यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण ४५ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणण्यात समितीला यश आले आहे.’’ ते म्हणाले, ‘‘रस्ता सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालय तसेच रस्त्यावर विविध ठिकाणी प्रबोधन आणि जनजागृती केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. कुडाळ येथे होत असलेला विरोध आता मावळला आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामाला आता गती येईल तर जानेवारी २०२१ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे लवकरच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महामार्गाचा लोकार्पण सोहळा करण्यात येईल.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम करण्यापूर्वी जिल्ह्यात तीन ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र निश्‍चित होते. आता चौपदरीकरणामुळे दोन अपघातप्रवण क्षेत्र कमी झाले. आता केवळ आंबोली येथे एकच अपघात प्रवणक्षेत्र आहे. आता अंतर्गत रस्त्यावरील अपघात प्रवण क्षेत्र निश्‍चित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.’’ ते म्हणाले, ‘‘महत्त्वाच्या घोडगे-सोनवडे रस्त्याचा आराखडा मोनार्च कंपनीने दिले आहे. एकूण १२ किलोमीटररस्त्याचे अंदाजपत्रक ३०० कोटींवरून ६५० कोटींवर गेले आहे. एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून यासाठी अर्थपुरवठा उपलब्ध करून देऊन या रस्ता कामाला गती देण्यात येणार आहे.’’ या वेळी मालवण नगराध्यक्ष महेश कांदळकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र आदी उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com