निर्बंधाचे धक्के पर्यटनाला ; स्थिती पूर्वपदावर येणार कधी?

जिल्ह्यातील अवस्था; स्थिती पूर्वपदावर येणार कधी? व्यवसायावर परिणाम
impact of restrictions tourism When will situation normal Malvan
impact of restrictions tourism When will situation normal Malvansakal

मालवण : ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने पुन्हा निर्बंध घातल्याने ऐन बहरात आलेला पर्यटन व्यवसाय गेले महिनाभर पुन्हा पूर्णतः कोलमडून गेला आहे. निर्बंधामुळे पर्यटकांनी येथे पाठ फिरविल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. आता शासनाने पुन्हा नव्याने निम्म्याने पर्यटन स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी इथल्या पर्यटनाला मूळ पदावर यायला किती वेळ लागेल हे सांगणे कठीण बनले आहे.

कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या काळात येथील पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प राहिल्याने पर्यटन व्यावसायिकांना तसेच पर्यटनावर अवलंबून असलेल्या अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पर्यटनस्थळे खुली झाल्याने देशाच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले. पर्यटनस्थळांबरोबर साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी हजेरी लावली. सप्टेंबरनंतर पर्यटन व्यवसाय बहरू लागल्याने मागील दोन वर्षांतील तूट भरून काढण्याचा प्रयत्न पर्यटन व्यावसायिकांकडून झाला; मात्र कोरोना आणि ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेमुळे शासनाने पुन्हा निर्बंध कडक केल्याने बहरात आलेला पर्यटन व्यवसाय गेले महिनाभर पूर्णतः थंडावला आहे.

गेले महिनाभर पर्यटन पूर्णतः ठप्प राहिल्याने निवास व्यवस्था, हॉटेल तसेच पर्यटनावर अवलंबून अन्य छोट्या, मोठ्या व्यावसायिकांसमोरील चिंतेत वाढ झाल्याचे दिसून आले. कामगारांचे पगार, वीज बिले तसेच अन्य बाबींसाठी होणारा खर्च कसा भागवायच्या या समस्येने व्यावसायिक हैराण झाले. ओमिक्रॉनचा संसर्ग कमी होत असल्याने विविध पर्यटन संस्थांनी पर्यटन सुरू करण्यासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने पर्यटनस्थळे निम्म्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र पर्यटकांना लसीचे दोन डोस पूर्ण करण्याबरोबरच अन्य कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यास किती प्रमाणात दाखल होतात हे येत्या काही दिवसात दिसून येईल. गेल्या दोन वर्षांतील निर्बधांमुळे पर्यटनाची मोठी हानी झाली आहे. निर्बध उठवल्यानंतर पर्य़टन मूळ पदावर यायला बराच कालावधी लागतो. आताही पर्यटन मूळ पदाकडे सरकत असताना निर्बध पुन्हा आले. आता यात शिथिलता आली तरी अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे पर्यटन कधी बहरणार याबाबत व्यावसायिकही साशंक आहेत. या निर्बधांच्या धक्क्यातून पर्यटन क्षेत्र किती लवकर सावरेल हे सांगणे कठिण बनले आहे.

मासळीच्या दरात मोठी घसरण

ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेमुळे पर्यटन ठप्प झाल्याने पर्यटकांनी येथे पाठ फिरविली. मागणी कमी झाल्याने मासळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या इसवन ६०० रुपये किलो, पापलेट १ हजार रुपये किलो, बांगडा ३०० ते ३५० रुपये टोपली, रापणीचा बांगडा ५०० टोपली, टायनी कोळंबी १५० रुपये किलो, कोळंबी ४५० रुपये किलो, व्हाईट कोळंबी ५०० रुपये किलो, सरंगा ६०० रुपये किलो या दराने उपलब्ध होत आहे.

ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेमुळे शासनाने पुन्हा निर्बंध घातल्याने येथील पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. गेले महिनाभर पर्यटकच दाखल न झाल्याने याचा मोठा फटका व्यवसायावर झाला आहे. आता शासनाने निम्म्याने पर्यटनस्थळे खुली केली आहेत. यात कोरोनाच्या नियमांचे पालन पर्यटकांनी करणे बंधनकारक आहे. पुन्हा पर्यटन बहरेल अशी अपेक्षा आहे.

- मंगेश सावंत, अध्यक्ष, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com