रत्नागिरीतील जोशीवाडी धरणातून विसर्गात वाढ 

निवे बुद्रुक (ता. संगमेश्‍वर) - धरणातून सुरू असलेला विसर्ग.
निवे बुद्रुक (ता. संगमेश्‍वर) - धरणातून सुरू असलेला विसर्ग.

देवरूख - विहीर कोसळलेल्या निवे बुद्रुक जोशीवाडी धरणाच्या विसर्ग नलिकेतून सोमवारी पाण्याचा विसर्ग अचानक वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तत्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत वस्तुस्थितीची पाहणी करीत आपणच पाण्याचा विसर्ग वाढवल्याचे जाहीर केले. 

कोकण पाटबंधारे मंडळ रत्नागिरी पाटबंधारे विभागाने निवे बुद्रुक जोशीवाडी येथे हे धरण 1987 मध्ये बांधले होते. 1982-83 ला धरणाच्या कामाला प्रारंभ झाला होता. धरणाची लांबी 148 मीटर असून महत्तम उंची 29.93 मीटर आहे. याचे पाणलोट क्षेत्र 3.65 चौरस किलोमीटर असून सांडव्याची लांबी 43 मीटर आहे. 10 वर्षांपूर्वी हे धरण मधोमध फुटले; मात्र त्यावेळी पाणीसाठा नसल्याने कोणताही अनर्थ घडला नव्हता. त्यानंतर या भागाची डागडुजी केल्यानंतर आजपर्यंत या धरणाला धोका निर्माण झालेला नव्हता. 

दोन महिन्यांपूर्वी धरणालगतच जमिनीला तडे जाणे, जमीन खचणे, झाडे कोसळणे, सांडव्यातील पाण्याची दिशा बदलणे असे प्रकार होऊ लागले होते. त्यावेळी प्रथम पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी, नंतर वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञांनी धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा दिला होता. काल (ता. 13) धरणाची मुख्य विमोचक विहीर कोसळल्याने धरणाला धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. यामधूनच कालव्याला पाणी सोडण्यात येते. विहीर वरपासून धरणाच्या पाणी पातळीपर्यंत म्हणजेच 4 मीटर परिघाइतकी कोसळली.

विहिरीला पिचिंग केलेले दगड एका बाजूला पडले. पाटबंधारेचे अभियंता संजय मुंगळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. वरिष्ठांना धरणाला धोका नसल्याचा निर्वाळा दिला होता. 
सोमवारी सकाळी काही ग्रामस्थ धरणाच्या दिशेने गेले असता त्यांना धरणाच्या विसर्ग नलिकेतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे निदर्शनास आले. याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर पाटबंधारेचे अधिकारी मुंगळे यांनी ग्रामस्थांसह धरणाची पुन्हा पाहणी केली. कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट केलेच, शिवाय विसर्ग नलिकेतून वाढलेला प्रवाह हा आपणच वाढवल्याचे सांगितले. 

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याशिवाय विहीर का कोसळली हे समजणार नाही. त्यामुळेच आम्ही पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. दोन दिवसांत पाणी कमी होईल तेव्हा हे कारण स्पष्ट होईल. ग्रामस्थांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 

- संजय मुंगळे, अभियंता, पाटबंधारे विभाग. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com