कणकवली : प्रकल्पग्रस्तांना हवे फेरमूल्यांकन

प्रकल्प अडकला नवा भूसंपादन कायदा लागू करण्याची मागणी
प्रकल्पग्रस्तांना हवे फेरमूल्यांकन
प्रकल्पग्रस्तांना हवे फेरमूल्यांकनsakal

कणकवली: नरडवे धरण पाटबंधारे प्रकल्पाची मान्यता दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचे भूसंपादन आणि कुटुंबांची मूल्यांकन यादी तयार केली होती. तेव्हा या प्रकल्पामध्ये एकूण ९६७ कुटुंबे बाधित होणार होती. यामध्ये नरडवेतील दुर्गानगरवाडीतील २३६, नरडवेतील ३२७, भैरव गावातील ९९, यवतेश्वर गावातील ५६ आणि जांभळ गावातील २४९ कुटुंबे बाधित होणार होती; मात्र हा प्रकल्प रखडल्याने प्रकल्पग्रस्तांनी फेरमूल्यांकन करण्याची मागणी केली आणि २०१३ चा सुधारित भूसंपादन कायदा लागू करावा, अशी मागणी केली. त्यामुळे धरणाचे सुरू असलेले काम बंद करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार शासनाने २०२० मध्ये कुटुंबांचे फेरसर्वेक्षण केले आणि कुटुंबांची वाढीव संख्या २३४ इतकी निश्चित केली; मात्र कुटुंबांची संख्या वाढत असताना ज्या कुटुंबामध्ये व्यक्तींच्या संख्या वाढल्या त्यांची नोंद झाली नाही. सुरवातीच्या काळामध्ये जी कुटुंबे निश्चित होती, त्या कुटुंबांमध्ये सदस्य संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या कुटुंबातील प्रत्येक कुटुंबाला ३७० चौरस मीटर इतका भूखंड देण्याचे निश्चित केले होते; मात्र कोणतीही सुविधा नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी भूमिका बदलली. बाधित प्रकल्पग्रस्तांचे लाभक्षेत्रामध्ये पुनर्वसन करून कायद्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना शासनाने शेतजमिनी देणे बंधनकारक होते. असे असतानाही प्रकल्पग्रस्तांना शेती कसण्यासाठी जमिनी द्याव्यात किंवा एकरकमी पैसे खात्यात जमा करावेत, अशी मागणी केली. पुनर्वसन करताना २०१३ च्या कायद्यानुसार प्रत्येक कुटुंबाचे पुनर्वसन करावे, कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे किंवा एकरकमी रक्कम द्यावी. प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनी देण्यासाठी तीन तालुक्यांतील ४८ गावांमध्ये ८ एकरपेक्षा अधिक जमिनी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा निकष लावला होता. संपादित जमिनी या कणकवली तालुक्यातील गावामध्ये असाव्यात, अशी मागणी होती. शासनस्तरावर अनेक बैठका झाल्या; परंतु आजपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नाही.

शेतजमिनीचे संपादन नाही

बुडीत क्षेत्रात वस्तीत असलेल्या लाभार्थींसाठी शेतजमीन देणे बंधनकारक आहे. काही प्रकल्पग्रस्तांनी जमिनीचा मोबदला त्याचवेळी भरणा केला आहे. अशांचे अजून शेतजमिनीचे संपादन झालेले नाही. प्रकल्प ८० टक्के पूर्ण झाला आहे. राज्य शासनाने २०२०-२१ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते; पण अजूनही भूसंपादन झालेले नाही.

दखल घ्या...

नरडवे धरण प्रकल्पांतर्गत धरणामध्ये पाणीसाठा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सह्याद्री पट्ट्यातील आणि गडनदी पात्रालगतच्या गावांमध्ये विकास प्रक्रिया होईल. बागायतदारांनाही लागवडीसाठी मोठी संधी मिळेल. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवून कोट्यवधी रुपये खर्च झालेल्या प्रकल्पात पाणीसाठा करून त्याचा उपयोग व्हावा, अशी मागणी शेतकरी नानचे यांनी केली आहे.

प्रकल्पांतर्गत कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे हरकूळसारख्या गावामध्ये ऊस, केळीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. खऱ्या अर्थाने प्रकल्प पूर्ण होऊन पाण्याचा वापर करता आला, तर पडीक क्षेत्राचा विकास वेगाने होईल.

- विजय नानचे, शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com