दहावीच्या निकालत यंदाही कोकण अव्वलच ; मुलींनी मारली बाजी...
रत्नागिरी : बारावी पाठोपाठ आज कोकण विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल सलग नवव्या वर्षी राज्यात अव्वल ठरला. मंडळाचा निकाल 98.77 टक्के लागला. आतापर्यंतचा हा सर्वाधिक निकाल ठरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.93 टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्याचा 98.69 टक्के लागला. कोरोना महामारीमुळे यंदा दहावीचा निकाल लागण्यास सुमारे सव्वा महिना उशीर झाला. तरीही युद्धपातळीवर काम करून हा निकाल लावण्यासाठी परीक्षक, विभागीय मंडळाने मेहनत घेतली. कोकणात यंदा परीक्षा केंद्रावर एकही गैरमार्ग, कॉपीचा प्रकार आढळला नाही.
गतवर्षी कोकण मंडळाचा निकाल 88.38 टक्के व यंदाचा निकाल 98.77 टक्के म्हणजे तब्बल 10.39 टक्के निकालात वाढ झाली आहे. दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर झाला. कोरोनामुळे यंदा कोकण विभागीय मंडळाची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. 2012 पासून कोकण विभागीय मंडळ अस्तित्त्वात आले आणि त्या वर्षीपासूनच सलग या मंडळाचा निकाल अव्वल लागला आहे. यंदा कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता.
रत्नागिरी जिल्ह्यातून 22547 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व 22506 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील 22211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11185 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी 11180 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 11060 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात एकूण 33686 पैकी 33271 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 98.39 टक्के व मुलींचे 99.16 टक्के म्हणजे मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 0.77 टक्के अधिक आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची टक्केवारी चांगली आहे. रत्नागिरीतून 1353 विद्यार्थ्यांपैकी 1059 विद्यार्थी (78.27 टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 460 विद्यार्थ्यांपैकी 355 उत्तीर्ण (77.17 टक्के) झाले.
रत्नागिरीतील 414 माध्यमिक शाळांसाठी 73 परीक्षा केंद्रे व सिंधुदुर्गातील 228 शाळांसाठी 41 परीक्षा केंद्रे होती. परीक्षेसाठी 103 मुख्य केंद्रे होती. संभाव्य कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 28 शाळांमध्ये चित्रीकरण करण्यात आले. 19 शाळांना भरारी पथकांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र काेकणात काॅपीचे प्रकार घडले नाहीत. गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन करता येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंगद्वारे भरता येणार आहे. मार्च 2020च्या दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह बसून उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन श्रेणी, गुण सुधार योजना उपलब्ध राहणार आहेत.
जिल्हा मुले उत्तीर्ण मुली उत्तीर्ण
रत्नागिरी 11446 11250 11060 10961
सिंधुदुर्ग 5783 5702 5397 5358
टक्केवारीनुसार विभागांचा निकाल
कोकण - 98.77 टक्के
पुणे - 97.34 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.