

कोकणातील ‘पांढरं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणार्या काजू पिकाला सातत्याने विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षामध्ये अवेळी पडणारा पाऊस, तापमान वाढ यांसह टी मॉस्किटो, फळ पोखरणारी अळी आणि खोंडकिडा यांसारख्या किडरोगांच्या प्रादुर्भावाचा आदींचा प्रामुख्याने सामना करावा लागत आहे. किडरोगांवर उपाययोजना करणे शक्य आहे. मात्र, प्रतिकूल हवामान आणि वाढत्या तापमानावर काय करायचं ? असा गहन प्रश्न शेतकरी अन् काजू बागायतदारांसमोर ठाकला आहे. त्यातून, बिघडणार्या जमा-खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी धडपडत असताना हापूस आंब्यासोबत हमखास पैका (उत्पन्न) मिळवून देणारं हे पीक कसं संरक्षित करायचं ? असा प्रश्न शेतकर्यांसमोर ठाकला आहे.
राजेंद्र बाईत, राजापूर
...........
तापमानाचा प्रतिकूल परिणाम
काजू पिकाच्या वाढीसाठी सर्वसाधारणतः 30 ते 35 अंश तापमान पोषक ठरते. मात्र, गेल्या पाच वर्षामध्ये सरासरी 37 ते 39 अंश तापमान जात आहे. त्याचा कोवळ्या काजू बीवर प्रतिकूल परिणाम होवून काजू बीची अपेक्षित वाढ होत नाही. त्यातून, काजूबीची साईज आणि वजन कमी होते. तसेच, वाढत्या तापमानामध्ये थ्रीप्स-फुलकीडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मोहर चांगला येवूनसुद्धा त्याचा फळधारणेवर प्रतिकूल परिणाम होवून चांगली फळधारणा होत नाही.
.............
किडींच्या प्रादुर्भावामुळे पोकळ बी
काजू पिकावर टी मोस्कुटो आणि फळ पोखरणारी अळी याचा गेल्या काही वर्षामध्ये प्रादुर्भाव वाढला आहे. टी मोस्कुटोचा अटॅक नवी येणारी पालवी आणि मोहर याच्यावर ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे झाडाची पाने आणि आलेला मोहर सुकून जाऊन त्याचा उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो.
फळ पोखरणारी अळी ही काजू आणि बोंडे तयार होताना त्यांना पोखरून काजुचा गर खाते. परिणामी पोकळ काजू बी तयार होते. त्याचा फटका शेतकरी तसेच, प्रक्रियाधारकांना बसून त्यांचे पोकळ काजू बियांमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. थ्रीप्स या रस शोषक किडीमुळे काजू अकाली पिकू लागला आहे. त्याचवेळी, थ्रीप्स ही कीड कलम काजूवरच मोठ्याप्रमाणावर येत असल्यामुळे त्याचा कलमी काजूच्या चवीवर प्रतिकूल परिणाम होवून काजूची चव कमी होत असल्याचे शेतकर्यांकडून सांगितले जात आहे.
...........
अवकाळी पावसाने खोंडकिडा बळावला
खोंड-किडा या किडीचा आंबा कलमांप्रमाणे काजूच्या झाडांवरही मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. आंब्याच्या तुलनेमध्ये काजूवर खोंडकिड्याचा जादा प्रादुर्भाव दिसत आहे. झाडाला खोंडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्याचे झाडाच्या अंतिम टप्प्यामध्ये समजते. मात्र, त्यावेळी योग्य त्या उपायोजना झाल्यास झाड जगते. मात्र, अनेकवेळा उपायोजना करूनही दहा-पंधरा वर्ष मोठ्या कष्टाने वाढविलेले झाड मरून शेतकर्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान होवून शेतकरी पुन्हा एकदा दहा-पंधरा वर्ष प्रगतीच्यादृष्टीने मागे सारला जातो. अवकाळी वा अवेळी पडणार्या पावसामुळे खोंडकिड्याला बळ मिळत असून गेल्या सुमारे दहा वर्षामध्ये खोंडकिड्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकर्यांकडून सांगितले जात आहे.