नोकरी सोडून कल्पवृक्ष संवर्धनाचा ध्यास

वांझोळे कुडाचामाच वाडीतील चेतन नाईक झाले नारळमित्र; १६ हजार झाडांची सफाई
नोकरी सोडून कल्पवृक्ष संवर्धनाचा ध्यास

साखरपा : जन्मापासून मुंबईत राहून पुढे नोकरी करणे ही पठडीतली पायवाट सोडून कोकणात मूळ गावी येऊन राहण्याचे धाडस फार थोडे युवक दाखवतात. त्यातही संगणकासारख्या प्रगत क्षेत्रात काम केल्यावर ते सोडून शेतीकडे वळण्याचे धाडस तर विरळाच. हे धाडस दाखवले आहे ते चेतन नाईक यांनी. नारळाच्या झाडावर चढण्याचे, नारळ संवर्धन याबाबत त्यांनी प्रशिक्षण घेऊन ते पाच जिल्ह्यात नारळ संवर्धनाचे काम करत आहेत.

नारळ ह्या पिकाला कोकणचा कल्पवृक्ष म्हणतात. पण त्याच्या लागवडीबाबत आणि नंतर घेण्याच्या काळजीबाबत शास्त्रशुद्ध ज्ञान फार थोड्या शेतकऱ्यांना असते. अशाच मोजक्यांपैकी एक म्हणजे वांझोळे इथल्या कुडाचामाच या वाडीतील ३६ वर्षीय तरुण चेतन नाईक. ते स्वत:ची ओळख अभिमानाने नारळमित्र नाईक अशी करून देतात. जन्म आणि बारावीपर्यंत शिक्षण मुंबईत झाल्यावर त्यांनी मुंबईतच नोकरीला प्रारंभ केला. संगणकीय क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरी केली. पण त्यानंतर त्यांनी आपल्या मूळ घरी येण्याचा निर्णय घेतला.

२०१२ साली त्यांनी भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राची नारळ मित्र प्रशिक्षण वर्गाची जाहिरात पाहिली. त्या प्रशिक्षणात ते सहभागी झाले. नारळाच्या झाडावर कसे चढायचे इथपासून नारळ संवर्धन, किडींचा प्रादुर्भाव रोखणे, पाणी आणि खत नियोजन, ह्या संदर्भात प्रशिक्षण त्यांनी घेतले. या प्रशिक्षणापासून नारळाशी त्यांचा ऋणानुबंध जुळला तो आजपर्यंत.

त्या प्रशिक्षणात कृषी विद्यापीठाकडून मिळालेली शिडी ते आजही झाडावर चढण्यासाठी वापरतात. त्यानंतर त्यांनी याच केंद्रात तज्ञ प्रशिक्षक म्हणून तीनवेळा सहभाग घेतला. त्यांनी प्रशिक्षण दिलेले ६० शेतकरी आज जिल्ह्यात आहेत. त्यापैकी पाच ते सहाजण स्वत: नारळ सफाईचा व्यवसाय करत आहेत.

चेतन नाईक हे गेली १० वर्षे नारळ सफाई आणि मार्गदर्शन व्यवसाय करत आहेत. रत्नागिरीसह पुणे, कोल्हापूर, सांगली, गोवा, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यातून त्यांना नारळ बागा सफाईसाठी बोलावण्यात येते. आजवर त्यांनी १६ हजार झाडांची सफाई, खत नियोजन केले आहे. याच व्यवसायातून अर्थप्राप्ती होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो असे ते अभिमानाने सांगतात.

चेतन नाईक यांनी वेगवेगळी प्रशिक्षणे घेतली आहेत. नारळ करीकरण, सेंद्रिय शेती, फुलशेती, फळे आणि भाजीपाला संस्करण, बायोगॅस बांधणी ही प्रशिक्षणे त्यांनी घेतली आहेत.

नारळाला कल्पवृक्ष म्हणत असले तरी कोकणातले शेतकरी या पिकाबाबत गंभीर नाहीत. आंबा आणि काजूसारख्या पारंपरिक फळशेतीला पर्याय म्हणून लोकांनी नारळ लागवडीवर भर द्यायला हवा.

- चेतन नाईक, नारळमित्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com