रत्नागिरी : कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन 1 ते 8 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केली. हा निर्णय राज्याचे मुख्य सचीव, जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि जिल्ह्याधिकारी यांच्या एकत्रित चर्चेनंतर ऑपरेशन ब्रेक द चेनसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचे अॅक्टिव्ह 117 रुग्ण आहे. ती संख्या शुन्यावर आणण्यासाठी आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी शहरासह दापोलीतील दोन गावात कोरोना रुग्णांची कोणतीही हिस्ट्री नसल्याने जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड होण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत चौकशी सुरू आहे; परंतु सुरक्षितता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती पाहून लॉकडाऊन शिथील करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्यासाठी हा निर्णय नाईलाजाने घेण्यात आला आहे. यापूर्वी नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळून चांगल्या प्रकारे सहकार्य केले होते. या लॉकडाऊनमध्ये देखील नियम पाळून जनता चांगले सहकार्य करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या वाढत असल्यामुळे आता टास्क फोर्सची पण स्थापना करण्यात येत असून मुंबई, पुण्यात असलेले प्लाजमा थेरेपी आता रत्नागिरीतही सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ऑपरेशन ब्रेक द चेन बाबत बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. हे लॉकडाऊन सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत राहणार आहे. या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही आहे.
ब्रेक चेनमध्ये हे राहणार बंद
जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद राहणार आहेत. या काळात संपूर्ण दुकाने, चारचाकी व दुचाकी वाहने, रिक्षा आदींना बंदी आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने, दवाखाने व इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. खासगी कार्यालयेही बंद राहतील. सरकारी कार्यालयात फक्त दहा टक्के कर्मचारी उपस्थिती राहणार आहेत. बँका व पोस्ट, कृषी संबंधीची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्णपणे कर्फ्यू असेल. फक्त वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडता येईल. हा लॉकडाऊन मंगळवारी रात्री बारानंतर कींवा बुधवारी सकाळपासून सुरू होईल.
मृतदेह दोन दिवस शवागारात; चौकशी समिती नियुक्ती
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अंधाधुंदी कारभाराची चौकशी करण्यासाठी एक दिवसीय समिती स्थापन करण्याच्या सुचना मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सुरवातीला सांगितले. काही काळाने तो अहवाल निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या काळात दोन दिवस लोटले तरीही तो मृतदेह जिल्हा रुग्णालयातील कोल्डस्टोअरेजमध्येच ठेवण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल मंत्री सामंत यांनी घेतली आहे. असा गोंधळ झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ते टाळण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमून दोन दिवसात अहवाल घ्या. त्यात हलगर्जीपणा केला असेल तर संबंधित अधिकार्यावर कारवाई करा अशा सुचना सामंत यांनी दिल्या आहे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.