
रत्नागिरी - यंदा हापूसचे उत्पादन अत्यंत कमी असले तरीही त्यावर मात करून रत्नागिरीतून कतार आणि इंग्लंडला पहिली शिपमेंट 26 मार्चला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील तीन बागायतदारांकडील सुमारे सातशे डझन हापूस आंबा प्रक्रिया केंद्रात दाखल झाला आहे.
आंबा निर्यातीसाठी बागातयदारांना वाशी आणि लासलगाव येथील प्रक्रिया केंद्राकडे जावे लागत होते; मात्र रत्नागिरीत ही व्यवस्था दिल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला. गतवर्षी कोरोनामुळे आंबा निर्यात कमी झाली. यंदा लवकरात लवकर निर्यात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी पणन विभागाने हे प्रक्रिया केंद्र सद्गुरू एंटरप्रायझेसला चालविण्यासाठी दिले होते. त्यानुसार पहिली शिपमेंट पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे.
आंबा वॉशिंग, ब्रशिंग करून तो योग्य तऱ्हेने पॅकिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करून इंग्लंडसह आखाती देशातील कतारला हा पाठविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या एंटरप्रायझेसकडून घेण्यात आल्या आहेत. रत्नागिरीत प्रक्रिया केल्यानंतर वातानुकूलित व्हॅनने मुंबईत विमानतळावर पाठविण्यात येईल. तिथून विमानाने तो पुढे पाठविण्यात येणार आहे.
वातावरणातील बदलांचा परिणाम हापूसवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. उत्पादनही अत्यंत कमी आहे. या परिस्थिती स्थानिक पातळीवर आंब्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातील आवश्यक माल एवढ्या लवकर मिळणे अशक्य आहे. या परिस्थितीत काही बागायतदारांनी सकारात्मक पवित्रा घेतला आहे. त्यामुळेच मार्च अखेरीस निर्यात सुरू होणार आहे.
निर्यातीसाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. प्रक्रिया केंद्रात आंबा आला आहे. त्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. पॅकिंग केल्यानंतर तो विमानाने पाठविण्यात येणार आहे.
- विश्वपाल मोरे, सद्गुरू एंटरप्रायझेस व्यवस्थापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.