आंबा काळवंडला ; देवगडमधील बागायतदार कात्रीत

पावसाचा दणका, फवारणीचा खर्चही वाया
Mango turned blacked
Mango turned blackedSakal

देवगड - वादळी पाऊस आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे आंबा बागायतदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. वादळी पाऊस पडतो म्हणून आंबा वाचवण्यासाठी एकीकडे फवारणी करावी, तर दुसरीकडे पुन्हा पाऊस कोसळून फवारणीवरील खर्च वाया जात असल्याने आंबा बागायतदार हतबल झाले आहेत. हाती येणाऱ्या पिकावरही किडरोगाचा प्रादुर्भाव जाणवण्याची शक्यता दाट असल्याने दरातील घसरणीची भीती आहे. निसर्गाच्या विचित्र कात्रीत बागायतदार सापडल्याने बागायतदारांची झोप उडण्याची वेळ आली आहे.

अलीकडे सातत्याने आंबा पिकाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असे वातावरण आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील मोहोरामध्ये नरफुलांचे प्रमाण अधिक राहिल्याने उत्पादन घटले. त्यावेळी आशेने आंबा बागायतदारांनी फवारणी केली खरी; मात्र पहिल्या टप्प्यातील उत्पादनच तुलनेत कमी झाल्याने बागायतदारांमधील निराशा वाढली. पुढे थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने हंगाम लांबण्याची प्राथमिक शक्यता होती. भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने पुन्हा एकदा आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा फवारणीने वेग घेतला. पहिल्या टप्प्यातील हंगाम संपला असे वाटत असतानाच अचानक वातावरणातील उकाड्यात कमालीची वाढ झाली. त्यामुळे आंबा फळगळ होण्यास सुरुवात झाली. किनारपट्टीवरील वातावरण बदलते राहिल्याने अचानक विजांच्या लखलखाटासह अवकाळी पाऊस झाला. आठ दिवसांपासून पावसाळी वातावरण कायम आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने काही भागांत आंबा कलमांचीही मोडतोड झाली. काढणीयोग्य आंबा काही प्रमाणात जमीनदोस्त झाला.

एकीकडे एकदा पाऊस पडून गेल्यावर कडकडीत ऊन पडले असते तर आंबा पिकाला तितकासा धोका राहिला नसता. झाडांना पावसाचे मिळाल्याने पोषकच स्थिती निर्माण झाली असती; मात्र तसे झाले नाही. सतत अधूनमधून पाऊस पडत राहिल्याने आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यातून पिकाची सुटका करण्यासाठी फवारणी आवश्यक होती. काही बागायतदारांनी जातीनिशी लक्ष देऊन फवारण्या घेतल्याही; मात्र आंबा फळाच्या देठाजवळ आंब्याच्या सालीत पाणी मुरत असल्याने फळांची पोषणक्षमता कमकुवत बनली आहे. पर्यायाने काढणी केल्यानंतरही आंबा पिकण्यामध्ये अनेक समस्या उद्भवत आहेत. एकीकडे वातावरण बदलाचे संकट आहे तर दुसरीकडे आंबा कसा निघेल याची बागायतदारांना चिंता सतावत आहे. त्यामुळे आंबा फळबाजारातील आतापर्यंत टिकून राहिलेले दर घसरण्याची भीती आहे.

पावसामुळे गणित बिघडले

  • बागायतदारांचे नियोजन कोलमडले

  • फवारणी खर्चात वाढ

  • आंबा पिकासाठीचा धोका वाढला

  • आंबा पूर्ण क्षमतेने पिकण्यामध्ये अडचणी

  • हवामान बदलाची टांगती तलवार कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com