
कणकवली (सिंधुदुर्ग) - यंदाच्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील भातशेतीची अपरिमित हानी झाली; मात्र मल्चिंग पेपरवरील भातशेती पूर्णतः: सुरक्षित राहिली. एवढेच नव्हे तर पारंपरिक भातशेतीपेक्षा तिप्पट उत्पन्न मिळाले आहे.
गावराई (ता. कुडाळ) येथील प्रगतिशील शेतकरी संतोष दिगंबर सामंत यांनी यंदा प्रथमच 20 गुंठे क्षेत्रात मल्चिंग पेपरवर भातलागवड केली होती. पेरणीनंतर 140 दिवसांत हे भात तयार झाले. धो धो पावसातही या भाताला फारसा धक्का बसला नाही. तसेच मल्चिंग पेपर लागवडीमध्ये पाणी निचरा लगेच होत असल्याने भातपीक कोसळून फुटवे येणे आदी प्रकार झाले नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरवरील भात लागवडीकडे प्राधान्य द्यावे, असेही आवाहन श्री. सामंत यांनी केले आहे.
आपल्या शेतीक्षेत्रात विविध प्रयोग करणाऱ्या संतोष सामंत यांनी गावराईत मल्चींग पेपरवर भातशेतीची लागवड करण्याचा प्रयोग केला होता. पहिलाच प्रयोग असल्याने त्यांनी 20 गुंठे क्षेत्रात "वाडा कोलम' या भाताची लागवड केली. भात पेरणीपूर्वीच माती परीक्षण करून सुुफला, युरिया व इतर सेंद्रिय खतांची मात्रा दिली होती. त्यानंतर गादीवाफे तयार करून जूनच्या पहिल्या आठवड्यात मल्चींग पेपरवर भात लागवड केली.
इतर पारंपरिक बियाण्याप्रमाणेच "वाडा कोलम' जातीचे भात 140 दिवसांत तयार झाले. याच दरम्यान मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भात कापणी लांबली; मात्र जोराचा पाऊस झाला तरी भातशेती आडवी झाली नाही. गेल्या आठवड्यात श्री. सामंत यांनी कृषी सहाय्यकांच्या उपस्थितीत भातकापणी केली.
यावेळी त्यांना प्रतिगुंठ्यामागे सरासरी शंभर किलो भाताचे उत्पादन मिळाले. यंदा मल्चिंग पेपरवर भात लागवडीचा पहिलाच प्रयोग असल्याने तंतोतंत तंत्रशुद्ध लागवड करता आली नाही. तरीही गुंठ्यामागे 100 किलोचे उत्पादन मिळाले. पुढील वर्षी मात्र प्रतिगुंठ्यामागे 130 ते 140 किलोचे उत्पादन निश्चितपणे मिळवून दाखवू, असाही विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. दरम्यान, मल्चिंग पेपरवरील भात लागवडीला ओरोस येथील कृषी पर्यवेक्षक अर्जुन परब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचेही सामंत यांनी सांगितले.
पारंपरिक भाताला 10 ते 15 फुटवे येतात. मल्चिंगपेपवरील भात लागवडीमध्ये 40 ते 55 पर्यंत फुटवे आले. तसेच पूर्वी प्रतिगुंठ्यामागे 6 ते 7 किलो पारंपरिक बियाणे लागत. तर मल्चिंगपेपरवर प्रतिगुंठ्यामागे 3 ते साडेतीन किलो एवढंच बियाणं लागलं. मशागतीचाही खर्च वाचला.
- संतोष सामंत, प्रगतिशील शेतकरी गावराई
यंदाच्या अतिवृष्टी कालावधीतही मल्चिंगपेपवरील भात लागवडीचा जिल्ह्यातील श्री. सामंत यांच्यासह सर्वच शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. एवढेच नव्हे तर या भातशेतीमधून तिप्पट उत्पादनही मिळाले आहे. तसेच जमिनीची धूपही थांबण्यास मदत झाली आहे.
- अर्जुन परब, कृषी पर्यवेक्षक ओरोस
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.