महामार्गाचे काम सुरू होऊनही धोका कायम 

mumbai - goa highway work danger
mumbai - goa highway work danger

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना ब्रेकनंतर सिंधुदुर्गातील चौपदरीकरण कामाला पुन्हा वेग आला आहे; मात्र तब्बल महिनाभर महामार्गाचे काम ठप्प राहिल्याने नद्या आणि शहरातील उड्डाणपुलांची कामे रखडली आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन ठेकेदार कंपन्यांनी केले आहे; मात्र सर्व्हिस रोड तसेच महामार्गाहून गावात जाणारे रस्ते, गटारे यांची कामे अपूर्ण असल्याने अपघातांचा धोका संभवतो. 

जिल्ह्यातील शहरांचा भाग वगळता उर्वरित ठिकाणी सिमेंट आणि डांबरी मार्गिका पूर्ण झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात महामार्ग निर्धोक असणार आहे. शहरांच्या ठिकाणी मात्र सर्व्हिस रोड अपूर्ण आहेत. तसेच गटारांचीही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात महामार्गावर तसेच महामार्गालगतच्या घरांमध्ये पाणी तुंबणे आदी प्रकार होण्याची शक्‍यता आहे. तसेच एस.टी.सह इतर वाहतूक पूर्ववत झाल्यास अरूंद सर्व्हिस रोडमुळे वाहतूक कोंडी होण्याचीही शक्‍यता आहे. 

सिंधुदुर्गातील 80 टक्‍के काम पूर्ण 
महामार्ग चौपदरीकरणात सिंधुदुर्गातील खारेपाटण ते झाराप या 83 किलोमिटर टप्प्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 80 टक्‍के पूर्ण झाले आहे. शहरातील उड्डाणपूल तसेच काही नद्यांवरील दुसऱ्या पुलांची कामे रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी या पुलांचे पिलर उभारून त्यावर गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपन्यांची धावपळ सुरू आहे. तर कणकवली, नांदगाव, कासार्डे आणि तळेरे या शहरांच्या ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपुलांची गती धिमी आहे. नोव्हेंबरपर्यंत हे पूल पूर्ण होतील तर जानेवारी 2021 पासून त्यावरून वाहतूक सुरू होईल अशी माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली. 

सोशल डिस्टन्सिंगमुळे कामाच्या वेगावर मर्यादा 
शहरांच्या ठिकाणी असलेले उड्डाणपूल, नद्यांवरील मोठे पूल तसेच छोट्या मोठ्या मोऱ्यांची कामे मे 2020 पूर्ण करण्याचे नियोजन ठेकेदार कंपन्यांनी केले होते. मात्र मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे चौपदरीकरणाची सर्व कामे ठप्प झाली. लॉकडाउनचा पहिला टप्पा संपल्यानंतर शासनाने रस्त्यांची तसेच चौपदरीकरण कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सिंधुदुर्गातील दिलीप बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉन या दोन्ही कंपन्यांनी चौपदरीकरणाची कामे पुन्हा सुरू केली आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळूनच ही कामे सुरू ठेवावीत असे निर्देश असल्याने चौपदरीकरण कामाची गती धिमी झाली आहे. 

नद्यांवरील पुलांची कामे सुरू 
महामार्ग चौपदरीकरणात सध्या जानवली आणि कसाल येथील पुलांची कामे अर्धवट आहेत. ती पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपन्यांनी धावपळ सुरू केली आहे. तर खारेपाटण नदीवरील पुलाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. याखेरीज कणकवली, जानवली या ठिकाणचे सर्व्हिस रोड देखील भूसंपादन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे रखडले आहेत. दरम्यान चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्यांनी विवादीत भाग वगळून चौपदरीकरणाचे काम सुरू केले आहे. सद्यस्थितीत शहरातून जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरण वेगाने केले जात असून सिंधुदुर्गात दोन्ही कंपन्यांकडे मिळून तीन हजार कामगार कार्यरत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com