चक्रीवादळाने नुकसान झाले पण पंचनामा नाहीच ....

nature hurricane immpact in dapoli (ratnagiri)
nature hurricane immpact in dapoli (ratnagiri)

चक्रीवादळाने नुकसान झाले पण  पंचनामा नाहीच .... 

विचारणा करण्यास गेलेल्या महिलांनाच अध्यक्षांनी केली धक्काबुक्की ... कोठे वाचा 

दाभोळ : चक्रीवादळाने झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केळशी गावातील कांदेवाडी येथील 11 ग्रामस्थांनी आमच्या वाडीत कोणतेच नुकसान झाले नाही, असा अर्ज दिला. मात्र ज्यांच्या घरांचे नुकसान झाले होते, अशा महिलांनी वाडी अध्यक्षांना याबाबत विचारणा केली असता वाडी अध्यक्षांच्या पत्नीने व अन्य उपस्थितांनी शिवीगाळ करून धक्‍काबुक्‍की केल्याची तक्रार योगिता योगेश खांबे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल केला. 


 दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी 23 जूनला आले होते. ते पाहणी करून गेल्यानंतर कांदेवाडीतील 11 जणांनी आमच्या वाडीतील कोणाचेही नुकसान झालेले नाही, असा अर्ज केळशी ग्रामपंचायतीत दिला होता. या अर्जाबाबत चर्चा करण्यासाठी योगिता खांबे व अन्य 14 महिला शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी  वाडी अध्यक्ष अनंत यशवंत मिसाळ यांच्याकडे गेले होते. तेव्हा त्यांनी 27 जूनला सकाळी 8 वाजता कांदेवाडी येथे बैठक घेऊन त्या अर्जाबाबत चर्चा करू, असे सांगितले. हे सांगितल्यावर योगिता खांबे व त्यांच्याबरोबर असलेल्या महिला परत जात असताना अध्यक्षांच्या पत्नी अस्मिता अनंत मिसाळ यांनी तुम्ही कोणीही येथून जायचे नाही, मी माझ्या माणसांना बोलावून घेते, असे सांगून त्यांनी त्यांच्या माणसांना बोलावून घेतले. या सर्वांनी योगिता खांबे व त्यांच्यासोबत आलेल्या महिलांना शिवीगाळ करून, धक्‍काबुक्‍की केली, हाताने तसेच काठीने मारहाण केली व सर्वांना मारून टाकतो व सर्वांचा निकाल लावतो, अशी धमकी दिल्याची तक्रार योगिता खांबे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली. तक्रारीनुसार अस्मिता अनंत मिसाळ, अनंत यशवंत मिसाळ व अन्य 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास हेड कॉन्स्टेबल येडे करत आहेत. 

तक्रार घेण्यास नकार 
तक्रार दाखल करण्यासाठी केळशी येथून रात्री दापोली पोलिस ठाण्यात आलेल्या या महिलांची तक्रार घेण्यास ठाणे अंमलदारांनी नकार दिला. पोलिस ठाण्याच्या आवारातून या महिलांना निघून जाण्यास सांगितले. कोणी पोलिस ठाण्याच्या आवारात दिसलात तर गुन्हा दाखल करण्याची धमकीही अंमलदाराने या महिलांना दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गावचे सरपंच महेंद्र रेवाळे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी ही घटना पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या कानावर घातल्यावर पाटील यांनी या महिलांची तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिल्यावर अंमलदार यांनी तक्रार दाखल करून घेतली. 
दरम्यान, यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी जमावाला पोलिस ठाण्याबाहेर थांबून केवळ फिर्यादीने आत थांबावे, असे सांगितल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com