
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - राज्य निवडणूक आयोगाकडून अलिकडेच घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांमध्ये तालुक्यात नव्याने 1073 मतदारांनी नाव नोंदणी केली. मृत व लग्न झालेल्यांपैकी 568 जणांची नावे कमी होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर त्या त्या गावातील नवमतदारांची संख्या यामध्ये जास्त आहे.
राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच राज्य निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी कार्यक्रम घेतला होता. 15 डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमाची मुदत होती. प्रत्येक बुथ केंद्रावर याबाबत अधिकारी नेमून ही नोंदणी केली होती; मात्र हवा तसा प्रतिसाद या मोहिमेला लाभला नाही. मुदत कमी असल्याने काहींचा हिरमोड झाला; मात्र तालुक्यातील ज्या अकरा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या गावांमध्ये अनेक नव्या मतदाराने आवश्यक कागदपत्रे सादर करत मतदान नोंदणी केली.
सतरा अठराच्या निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार तालुक्यामध्ये 1 लाख 17 हजार 782 मतदार होते. त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे. ही मतदार यादी सुधारित असणार असून यामध्ये मृत्यू झालेले मतदार आणि लग्न होऊन दुसऱ्या गावी गेलेल्यांकडून नावे कमी करण्याबाबत अर्ज केले आहेत. त्यानुसार ही नावे कमी होणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील पुढाऱ्यांकडून नव्या मतदारावर जास्त भर दिला गेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक मत सुद्धा निर्णायक असते. एका मताने सुद्धा पराभव पत्करावा लागल्याची कित्येक उदाहरणे निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात. यामुळे अथक परिश्रम करूनही मेहनतीवर पाणी सोडण्याची वेळ येते. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी नवमतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी खुद्द गाव पुढाऱ्याने पुढाकार घेतला.
नवमतदार हे युवा वर्गातील असल्याने सुशिक्षित आहेत. त्यामुळे या सुशिक्षित व मतदारांचा कल नेमका कोणाकडे असणार यावर निवडणुकीतील गणित ठरणार आहेत. युवा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गाव पुढाऱ्यांकडून तसेच राजकीय नेत्यांकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे; मात्र असे असले तरी सुशिक्षित नवा मतदार हा योग्य उमेदवाराला मतदान करेल यात शंका नाही. त्यामुळे तालुक्यातील अकराही ग्रामपंचायतीमध्ये नव मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.
चित्र पालटण्याची शक्यता
तालुक्यातील अकराही ग्रामपंचायती मोठ्या असून याठिकाणी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खरी लढत होणार असून निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर सद्यस्थितीत शिवसेनेची सत्ता होती; मात्र आता चित्र पालटण्याची शक्यता आहे. दोन्ही राजकीय गटांकडून पुर्ण ताकत लावून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.