रत्नागिरी : आत्मनिर्भर रॅलीवर टीका करणाऱ्या पालकमंत्री अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी काय योगदान दिले ते जाहीर करावे मग टीका करावी अश्या शब्दात भाजप प्रदेश सदस्य तथा माजी खासदार निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. निसर्ग वादळात जनतेला केलेली मदत शिवेनेचेच कोतवाल आणि सरपंच वाटून खाताहेत, मग जाब विचारायचा नाही का? ती टीका कशी काय होऊ शकते? असा सवाल करतानाच शिवसेनेचा ड्रामा आता जनतेला पचणार नाही, लवकरच भ्रष्टाचार बाहेर काढणार असा सज्जड इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
अनिल परब यांनी मुंबईत बसून भारतीय जनता पक्षाच्याच्या आत्मनिर्भर रॅलीवर टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार भाजपा प्रदेश सदस्य, माजी खासदार निलेश राणे यांनी घेतला आहे. ते म्हणाले , रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब मागील तीन महिन्यात फक्त अडीच दिवसच येऊन गेले, बाकी त्यांचा पूर्णवेळ मातोश्रीवरच गेला. निसर्ग चक्रीवादळ महिना उलटून गेला असताना त्यांनी या भागातील परिस्थितीची एकदाही पाहणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. उलट मुंबईत बसून व्हिडीओ टाकण्याचे आणि टीका करण्याचे काम ते करत आहेत. अशाप्रकारे चाललेल्या कारभाराबाबत, भ्रष्टाचाराबाबत, आम्ही विरोधक म्हणून जर सरकारला जाब विचारला तर त्यांनी त्याची उत्तरे द्यायलाच हवीत. आमचे प्रश्न म्हणजे ह्यांना टीका वाटते, म्हणून आम्ही फक्त बघत बसायचे का? असा सवाल त्यांनी केला.
निलेश राणे पुढे म्हणाले , पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्यासाठी अनिल परब यांनी काय योगदान दिले ते आधी सांगावे. जिल्हा रुग्णालयात सुरू असलेली लॅब सतत बंद पडते, अपुरे कर्मचारी आहेत अशा गोष्टींकडे त्यांचे लक्ष नाही. निसर्ग वादळानंतर आजही अनेक घरांमध्ये वीज पुरवठा पुर्ववत झालेला नाही. अनेकजण मदतीपासून उपेक्षित आहेत. त्यामुळे टीका करण्यापेक्षा जिथे मदत पोहोचली नाहीय तिथे मदत पोहोचविण्यासाठी परब यांनी प्रयत्न करावेत, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला.
तिवरे धरणाबाबतही तीच परिस्थिती आहे. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही तिथले लोक कंटेनरमध्ये राहत आहेत. आता ही वस्तुस्थिती लोकांसमोर येत आहे, त्यामुळेच शिवसेनेचा ड्रामा आता पचणार नाही. जिल्ह्याची प्रशासकीय सूत्र रत्नागिरीतून हलतात, अशावेळी कोरोनाच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेणे अपेक्षित होते, पण 200 रुग्णांचे सुद्धा क्वारंटाईन शिक्षण मंत्री उदय सामंत करू शकले नाहीत. त्यासाठी स्वतःचे योगदान देऊ शकले नाहीत. उलट अवैध दारू धंद्यावर पडलेल्या छाप्यातील माणसाला कसे वाचवायचा याची काळजी इथल्या उच्चतंत्र शिक्षण मंत्र्यांना लागली आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. या दोन्ही मंत्र्यांनी, आज जिल्ह्याची जनता ज्या विविध संकटांमध्ये, प्रश्नांमध्ये होरपळत आहे, त्यावर उपाययोजना करण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, याची जाणीव करून द्यायलाही निलेश राणे विसरले नाहीत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.