ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनाची वाट बिकट; विणीचा हंगाम लांबणीवर

तापमानामध्ये होणारे कमी-जास्त बदल या सार्‍यातून कासवाच्या विणीच्या म्हणजे घरटं करण्याच्या हंगामावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
kokan
kokansakal

दुर्मिळ प्रजाती मानल्या जात असलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्र कासवाची मादी रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर विणीच्या हंगामामध्ये अंडी घालण्यासाठी दरवर्षी येते. मात्र, समुद्रामध्ये सातत्याने विविध कारणांमुळे होणारे बदल, पर्यावरणामध्ये झालेले प्रतिकूल बदल, तापमानामध्ये होणारे कमी-जास्त बदल या सार्‍यातून कासवाच्या विणीच्या म्हणजे घरटं करण्याच्या हंगामावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यातून, घरटं करण्याचा ‘पिक नेक्स्टींग सिझन’ सुमारे महिनाभर लांबणीवर गेल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम अंड्यातून पिल्लं बाहेर येण्यावर (प्रजनन) होत आहे. प्रजनन काहीसे घटत असल्याचे प्राथमिक निरिक्षणे कासव अभ्यासकांकडून नोंदविली जात आहेत. यावर अभ्यासकांमध्ये मतमतांतराची शक्यता नाकारता येणार नाही. बदलत्या भौगोलिक स्थानांबाबत ही निरिक्षणे वेगवेगळी असू शकतील. निसर्गातील प्रतिकूल बदलाव रोखणे वा त्यावर मात करणे सद्यस्थितीमध्ये अशक्यप्राय असले तरी, समुद्र परिसरासह पर्यावरणामध्ये होत असलेला प्रतिकूल बदल लक्षात घेवून ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या संवधर्नासाठी प्रयत्न सुरू असून यातून पर्यावरणाची जाणीवही वाढत आहे.

राजेंद्र बाईत, राजापूर

दृष्टीक्षेपात आलिव्ह रिडले कासव

आढळ ; जगभरातील उष्णकटीबंधीय किनारे

प्राकृतिक अधिवास ; उष्ण कटिबंध व उपोष्ण कटीबंध

वजन ; सुमारे 50 कि. ग्रॅम. पर्यंत

लांबी ; 60 ते 70 सें.मी.

आकार ; फारसे खडबडीत नसलेले, पसरट व तंबूच्या आकाराचे.

रंग ; ऑलिव्ह हिरवा

डोक्याचा आकार ; मोठे, त्रिकोणी आकाराचे, वरचा जबडा अंकुशाकार

पाय ; वल्ह्यासारखे व पुढील प्रत्येक पायावर एक नख

खाद्य ; मृदूकाय प्राणी, जेली फिश आदी.

अंडी घालण्यासाठी जागेची निवड

ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या प्रजातीची मादी अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारपट्टीची निवड करते. सर्वसाधरणपणे नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीमध्ये मादी कासव वालुकामय भागात हायटाईड लेव्हलपासून सुमारे 50 ते 100 मीटर अंतरावर 1 ते 15 फूट उंचीचा खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालते. सर्वसाधारणपणे शंभर ते दोनशे इतकी त्यांची संख्या असते.

घरट्यासाठी कोणता योग्य काळ

पहाटेच्या दरम्यान कासवाची मादी अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येते. सुमारे दीड फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालून समुद्रामध्ये परत जाते. सुर्योदयानंतरच्या स्वच्छ प्रकाशातून वाढणार्‍या तापमानाचा या अंड्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुर्यप्रकाश आणि तापमानाचा हा प्रतिकूल परिणाम होण्यापूर्वी ज्या स्थितीच्या तापमानामध्ये मादीने खड्ड्यामध्ये अंडी घातली होती त्या तापमानामध्ये त्या अंड्यांचे सुर्योदयापूर्वी योग्य पद्धतीने संवर्धन होणे अपेक्षित मानले जाते. त्याप्रमाणे सुर्योदय होण्यापूर्वी या अंड्यांचे कासवमित्रांकडून केले जाते.

नेमकी याच किनारपट्टीची निवड का ?

रत्नागिरी जिल्ह्यातील चौदा ठिकाणांसह कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये कासवाची अंडी गेल्या काही वर्षापासून सातत्याने सापडत आहेत. मात्र, याच भागामध्ये कासवाच्या माद्या अंडी घालण्यासाठी नेमक्या का येतात ? असा प्रश्‍न सार्‍यांसमोर ठाकतो. मात्र, त्याचे निश्‍चित कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, जिल्ह्यातील चौदा ठिकाणा व्यतिरीक्त अन्य किनारपट्टीवरील भागात कासवाची मादी अंडी घालण्यासाठी येत नसेल असे नाकारताही येण्यासारखे नसल्याचे मत काही कासवमित्रांकडून मांडले जात आहे. असे असले तरी, गेल्या काही वर्षामध्ये कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ज्याअर्थी अंडी घालण्यासाठी कासवाची मादी येते त्याअर्थी किनारपट्टीवरील ‘ती’ ठिकाणं ऑलीव्ह रिडले प्रजातीच्या समुद्र कासवांसाठी काहीशी ’सेफ झोन’ ठरताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, आंजर्ले, मुरूड, कर्दे, लाडघर, गावखडी, वेत्ये-तिवरे, आंबोळगड, माडबन, दाभोळे, कोळथरे, गुहागर, मालगुंड येथे वनविभाग आणि कांदळवन कक्षांच्या मार्गदर्शनाखाली कासव संवर्धन केले जात आहे.

कासवमित्रांची भूमिका महत्वपूर्ण

वाळूमध्ये खड्डा खोदून मादी कासवाने घातलेल्या अंड्यांचा शोध घेवून त्याचे संवर्धन करण्यामध्ये कासव मित्रांची भूमिका महत्वाची ठरत आहे. कासवाच्या प्रजननाच्या काळामध्ये पहाटेच्या प्रहरी समुद्र किनारपट्टीवर नियमित फेरफटका मारून वाळूमध्ये कासवाच्या उमटलेल्या पावलांचा पाठलाग करीत कासवमित्रांकडून कासवाच्या मादीने घातलेल्या अंड्यांचा शोध घेतला जातो. त्यानंतर, त्या अंड्यांना जंगली श्‍वापदे, कुत्री यांच्याकडून असलेला संभाव्य धोका लक्षात घेवून त्यांचे कासवमित्रांकडून वनविभागाच्या मागदर्शनाखाली योग्य पद्धतीने संरक्षित करून ठेवली जातात.

तापमानाची महत्वपूर्ण भूमिका

कासवांचा प्रजनन दर म्हणजे अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याची संख्या चांगली राहण्यासाठी अंडी ठेवण्यासाठी संवर्धित केलेल्या खड्डयातील तापमान आणि अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याच्या कालावधीतील तापमान महत्वपूर्ण ठरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. अंडी उबविण्याचा कालावधी आणि पिल्लं बाहेर येण्याचा कालावधी यावेळी सर्वसाधारण हे तापमान 33 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असणे समाधानकारक प्रजननासाठी उपयुक्त मानले जाते. यामध्ये सुमारे 27 अंश सेल्सिअस तापमान राहील्यास सर्वसाधारणपणे अंड्यातून बाहेर येणार्‍या पिल्ल्यांच्या संख्येमध्ये सर्वाधिक नरांची संख्या जास्त असते. सुमारे 33 अंश सेल्सिअस तापमान राहील्यास नरांच्या तुलनेमध्ये माद्यांची संख्या जास्त असते आणि तेच तापमान सुमारे 29.5 अंश सेल्सिअस राहील्यास अंड्यातून बाहेर पडणार्‍या पिल्ल्यांच्या संख्येमधील नर-मादीचे प्रमाण सरासरी ‘फिफ्टी-फिफ्टी’ टक्के राहत असल्याची माहिती वाईल्डलाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडीयाच्या अभ्यासक सुमेधा कोरगावकर यांनी दिली.

‘पिक नेक्स्टींग सिझन’ लांबणीवर

पर्यावरणातील सातत्याने झालेल्या बदलांचा ऑलिव्ह रिडले कासवाच्या विणीच्या हंगामावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा प्राथमिक अंदाज कासव अभ्यासकांकडून वर्तविला जात आहे. त्यातून, अंडी घालण्यासाठी येण्याचा मादी कासवाचा कालावधीमध्ये सुमारे महिनाभर उशीरा सुरू होत असल्याचे दिसत आहे. त्यातून, गेल्या चार-पाच वर्षामध्ये ‘पिक नेक्स्टींग सिझन’ हा जानेवारी-फेब्रुवारी राहील्याचे दिसत असून त्याचा कासवांच्या प्रजननदरावर प्रतिकूल परिणाम झाल्याची माहिती कासव अभ्यासकांकडून दिली जात आहे.

चिंताजनक प्रजनन दर

सर्वसाधारणतः डिसेंबर हा ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचा विणीचा हंगाम मानला जातो. घरटं केल्यापासून सुमारे 50-55 दिवस म्हणजे सुमारे दिड महिन्याच्या कालावधीनंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. यामध्ये सर्वसाधारणतः साठ ते सत्तर टक्के प्रजननदर राहणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये तो सरासरी 37 ते 40 टक्क्यांवर आल्याचे प्रथमदर्शनी चित्र दिसत असल्याची माहिती कासव अभ्यासकांकडून नोंदविली गेली आहे. गतवर्षी सुमारे 23 हजारहून अधिक अंडी जतन करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 7 हजार 200 कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. हा प्रजनन दर सुमारे 31.30 टक्के राहील्याची माहिती उपलब्ध होत आहे

प्रजनन दरावरील परिणामकारक गोष्टींचा अभ्यास अपेक्षित

अंडी घालण्यासाठी कासवाची मादी सुमारे दीड फूट खोल खड्डा खोदते. खड्ड्यासाठी जागेची निवड करताना सर्वसाधारण अंड्यांच्या उबवणीवर परिणामकारक ठरणार्‍या विविधांगी गोष्टींचा (उदा. तापमान आणि तेथील परिसर) यांचा कासवाची मादी सर्वसाधारणतः प्राधान्याने विचार करताना दिसते. मात्र, कासवाच्या मादीचे अंडी घातल्यानंतर त्यांचे हॅचरीद्वारे संवर्धन करीत असताना अपेक्षित तापमान राखले जाईल असा खड्डा हॅचरीमध्ये खोदला जातो का ? हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आणि संशोधनाचा ठरत आहे. मात्र, तशा पद्धतीने मिळता-जुळता खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, काहीवेळा तो चुकीचा ठरण्याची शक्यताही नाकारता येण्यासारखे नाही. त्याचवेळी हॅचरी तयार करताना बहुतांशवेळा शेडनेटचा उपयोग केला जातो. शेडनेटच्या माध्यमातून आकाशातून येणारी प्रखर सुर्यकिरणे रोखून समतोल तापमान राखणे शक्य होत आहे का ? याचाही विचार होणे गरजेचे आहे. सर्वसाधारणतः या सार्‍या गोष्टी अंड्यातून पिल्लं बाहेर पडणे वा प्रजनन दर यावर परिणामकारक ठरताना दिसत आहेत.

चांगल्या प्रजननदराला अनुकूल काळ

डिसेंबरमध्ये मादी कासवाने घरटं करून त्यामध्ये अंडी घातल्यास साधारणतः फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये अड्यातून पिल्लं बाहेर येतात. या कालावधीतील तापमानामध्ये चांगला प्रजननदर राहतो. या कालावधीमध्ये अंड्यातून बाहेर पडणारी पिल्ले सर्वसाधारणतः सक्षम असून त्यामध्ये मादींच्या तुलनेमध्ये नरांची संख्या जास्त असते. मात्र, फेब्रुवारीमध्ये घरटं केल्यास म्हणजे अंडी घातल्यास त्यानंतर, एप्रिल-मे महिन्यामध्ये अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. या कालावधीमध्ये अंड्यातून बाहेर पडणारी पिल्लांमध्ये नरांपेक्षा माद्यांची संख्या जास्त असते. मात्र, ही पिल्लं काहीशी असक्षम (विक) असल्याचे निरिक्षण कासव अभ्यासकांच्या नोंदीतून पुढे आले आहे. पिल्लांची साईज आणि पिल्ल्यांच्या चालण्याच्या गतीवरून त्यांची शारीरीक क्षमता लक्षात येत असल्याचेही कासव अभ्यासकांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

बदलेल्या पिक नेक्टींग मोसमावर परिणाम

सर्वसाधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत असलेले तापमान अंड्यांची चांगली उबवण होणे आणि अंड्यातून जास्तीत जास्त पिल्ले बाहेर येण्यासाठी पोषक ठरत आहे. मात्र, त्यानंतर, तापमानामध्ये वाढ होवून कमालीचा म्हणजे असह्या उष्मा झालेला असतो. त्याचा प्रतिकूल परिणाम अड्यांच्या उबवणीवर होताना दिसतो. त्यामध्ये अनेक अंड्यांमध्ये जन्म म्हणजे अंड्यातून बाहेर येण्यापूर्वी मृत्यू झालेला असतो. तर, अंड्यातून बाहेर आल्यानंतर समुद्राकडे झेपावत असताना असह्य तापमान वा उष्म्यामुळे काही पिल्लांचा समुद्रामध्ये जाण्यापूर्वी किंवा समुद्रामध्ये गेल्यानंतर काही दिवसांमध्ये मृत्यू होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये विशेषतः कोकणा किनारपट्टीवर असलेल्या काळ्या वाळूच्या तापमानाचाही काहीसा प्रतिकूल परिणाण होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

गतवर्षी सुमारे 23 हजारहून अधिक अंडी जतन करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 7 हजार 200 कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. हा प्रजनन दर सुमारे 31.30 टक्के राहीला आहे. त्यामुळे यावर्षी संवंर्धित केलेल्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान वनविभाग, कांदळवन कक्ष, कासवमित्र आणि निसर्गस्नेहींसमोर ठाकले आहे.

पिक नेक्स्टींग सिझन लांबणीवर जाण्याची कारणे

  • पर्यावरणामध्ये सातत्याने होणारे प्रतिकूल बदल

  • नोव्हेंबर-डिसेंबरमधील ढगाळ वातावरण

  • समुद्राच्या पाण्याचे वाढलेले तापमान

  • बदललेला सी वॉटर करंट

  • समुद्र किनार्‍याच्या काळ्या वाळूचे तापमान

.

  • अपेक्षित वा समाधानकारक प्रजननदर राखण्याचे उपाय

  • नियोजनबद्धरीत्या अंड्यांचे संवर्धन होणे गरजेचे

  • हॅचरीसाठी शेडनेट उभारण्याऐवजी माडाची झावळांचा उपयोग

  • हॅचरीतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी शिंपडण्याचे नियोजन

  • योग्यपद्धतीने हॅचरी मॅनेजमेंट होणे गरजेचे

पर्यावरणामध्ये विविधांगी झालेले बदल, तापमानामध्ये सातत्याने होणारा कमी-जास्तपणा यांच्यासह समुद्रामध्ये होत असलेल्या बदलांचा ऑलिव्ह रिडले कासवाची मादी किनार्‍यावर येवून अंडी घालण्यासाठी घरटं करण्याचा हंगामावर प्रतिकूल परिणाम होत आहे का ? याबाबत काही संस्था आणि संशोधकांकडून अभ्यास सुरू आहे. त्यामध्ये स्वतः आपण सहकार्‍यांसमवेत सुमारे वीस वर्षातील अंडी घालण्याचा कालावधी, अंड्यांची संख्या आणि अंड्यातून बाहेर पडणार्‍या पिल्ल्यांची संख्या आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षापासून कासवाच्या मादीचा नेक्स्टींग करण्याचा म्हणजे ‘पिक नेक्स्टींग सिझन’ हा सुमारे महिनाभर उशीरा म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी राहील्याचे चित्र दिसत आहे. याबाबत ठोस कारणामिमांसा सद्यस्थितीमध्ये करणे शक्य नसले तरी, पर्यावरण, तापमान आणि समुद्रातील बदल यांचा कासवांच्या ‘पिक नेक्स्टींग सिझन’ हंगामावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे प्रथमदर्शनी चित्र दिसत आहे. भविष्यातील सखोल आणि परिपूर्ण अभ्यासाअंती त्याबाबत निश्‍चित चित्र स्पष्ट होईल.

- सुमेधा कोरगावकर, वाईल्डलाईफ इन्स्टीट्युट ऑफ इंडीया

गेल्या काही वर्षापासून ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढीसह पर्यावरणातील बदलांना सामोरे जावे लागत आहे. या बदलांची झळ कासवांसह समुद्रातील जीवसृष्टीलाही बसत आहे. समुद्रातील वादळांचा कासवांच्या मेटींगवर आणि तापमान वाढीचा त्यांच्या प्रजननावर प्रतिकूल परिणाम होते आहे. कासवांच्या नर-मादीच्या संख्येचा संतुलन राहत नाही. त्याचाही कासवांच्या नेक्स्टींगवर परिणाम होऊ शकतो. यासाठी पर्यावरणाचा र्हास आणि बिघडणारा समतोल रोखण्यासाठी पावले उचलली पाहीजेत. पर्यावरण संवर्धनासाठी सार्‍यांनी पुढाकार घेतला पाहीजे.

- मोहन उपाध्ये, कांदळवन फाऊंडेशन

हंगाम लांबणे हे नैसर्गिक बदलाचा परिणाम आहे. त्यानुसार कासविणी अंडी घालण्यासाठी किनारी येतात. प्रत्येक कासविणीची अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभागाकडून किनारी भागात कासमित्रांच्या मदतीने प्रयत्न केले जातात. यंदाही त्याप्रमाणे नियोजन केले आहे. वेळास, आंजर्ले येथे कासव महोत्सव होतात. त्याचा फायदा तेथील पर्यटनासाठी होत आहे.

- राजश्री किर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण

विविध कारणांमुळे पर्यावरण आणि समुद्रामध्ये होत असलेल्या बदलांचा कासवांच्या जीवनचक्रावर काहीसा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. सातत्याने होत असलेल्या या प्रतिकूल बदलांमुळे कासव आणि जलसृष्टी भविष्यात धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करणार्‍या उपाययोजना, जनजागृती करताना पर्यावरणाचा होणारा र्हास रोखण्याच्यादृष्टीने सार्‍यांकडून प्रयत्नांची आवश्यकता आहे.

धनंजय मराठे, राजापूर

वातावरणात अजून म्हणावं तसा गारवा किंवा थंडी निर्माण झाली नाही आहे. वातावरणात सारखा बदल जाणवत आहे. नैसर्गिक वातावरण पोषक नसल्यामुळे अजूनही वेळास किनार्‍यावर कासवाचे अंडी घालण्यासाठी आगमन झालेले नाही. वेळासला मोठ्या प्रमाणात कासविणी अंडी घालण्यासाठी येतात. त्यांचा समुद्राकडे सुरु होणारा प्रवास पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व पर्यटक वाट पाहत असतात. त्यांना यंदा विलंब होणार आहे.

- हेमंत सालदुरकर, वेळास ग्रामस्थ

मालगुंड किनार्‍यावर सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यापासून कासव घरटं करण्यासाठी दाखल होतात. परंतु यंदा अजूनही कासवांचं आगमन झालेले नाही. पहिलं घरटं ऑक्टोबर महिन्यात राजापूर तालुक्यात सापडलं होतं. मात्र त्यानंतर अन्य किनार्‍यावर घरटी सापडण्याचे प्रमाण कमी आहे. यावर्षी कासवांचा हंगाम उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे. याची कारणं मात्र सांगता येणार नाहीत.

- ऋषिराज जोशी, मालगुंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com