कुटूंब एकत्र यावे या उद्देशाने `या` गावात आहे एकच गणपतीची प्रथा 

One Village One Ganesh Tradition For Family Integration
One Village One Ganesh Tradition For Family Integration

पावस ( रत्नागिरी) - काही लोक हौसेने गणपती आणतात, तर काही लोक आपलं कुटुंब वर्षातून एकदा तरी एकत्र यावे, या प्रमुख उद्देशाने एकच गणपती आणतात. रत्नागिरी तालुक्‍यातील गणेशगुळे येथे स्वयंभू गणेशाचे स्थान असलेले मंदिर आहे. त्यामुळेच भंडारवाडी परिसरातील भाविक या गणपतीला आराध्य दैवत मानून गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती बसवत नाहीत. "गलबतवाल्यांच्या गणपती'ला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. 

दंतकथेनुसार पावस गावच्या रामचंद्र चिपळूणकरांना पोटशूळ जडला होता. ते गुळ्याच्या समुद्रावर जीव द्यायला निघाले होते; मात्र वेदना असह्य झाल्याने त्यांना पुढे जाताच आले नाही, ते जवळच्या एका झुडपात पडून राहिले. 21 व्या दिवशी रात्री लंबोदराने दृष्टांत दिला, ""तू बरा होशील. याच ठिकाणी माझे वास्तव्य आहे. येथे तू माझे मंदिर उभार. यासाठी सातारचे छत्रपती शाहू महाराज मदत करतील.'' त्याप्रमाणे सातारच्या शाहू महाराजांना तसा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे त्यांनी चिपळूणकरांना सर्वतोपरी मदत केली. 

भंडारवाडी परिसरातील अनेक कुटुंबांनी नवीन घरे बांधूनही गणेशोत्सव काळात गणेशाची मूर्ती घरात बसवली नाही. त्यामुळे या वाडीतील अनेक लोक गणेशगुळे येथील गणेशमंदिर येथे स्वयंभू असलेला गणपती हाच आपल्या घरातला गणपती मानून दरवर्षी माघी चतुर्थीला मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करतात. पावस परिसरात दरवर्षी 5 हजार 675 गणेशमूर्तींचे आगमन होते. परंतु कोरोनामुळे भक्तांचा उत्साह थोडा कमी झाला आहे; मात्र गणेशगुळे भंडारवाडी परिसरात उत्साह कायम आहे. सर्वांनी एकत्र येऊन "एक वाडी एक गणपती" संकल्पना काही ठिकाणी सत्यात येत असताना येथे मात्र पारंपरिक स्वयंभू गणेशाच्या स्थानाला आपले दैवत मानतात. 

ही प्रथा अपवाद म्हणूनच.. 
भंडारवाडीमध्ये ठराविक पाच ते सहा घरी नवसाचे म्हणून गणपती आणतात. अन्यथा, त्या परिसरात गणेश मंदिरातील मूर्ती आपल्या घरातीलच आहे, असे समजून उत्सवाचा आनंद लुटत असतात. ही प्रथा अपवाद म्हणूनच आहे. 

नवस करून सुखरूप परतण्यासाठी साकडे 
पूर्वीच्या काळी भंडारवाडी परिसरात दर्यावर्दी लोक होड्या, गलबते या माध्यमातून व्यापार व व्यवसाय करत होते. येथील लोक व्यवसाय करण्यासाठी गलबताच्या माध्यमातून सफरीवर निघाले की, गणपतीला नवस करून सुखरूप परत आणण्यासाठी साकडे घालत. नवसाला पावत असल्यामुळे त्यावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे त्याला "गलबतवाल्यांचा गणपती' असे म्हटले जाऊ लागले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com