खुशखबर; हापूस निर्यातीला हिरवा कंदील ; समुद्रामार्गे जाणार विविध देशात 

permission granted konkan hapus mango
permission granted konkan hapus mango

रत्नागिरी - वाहतुकीतील अडचणी दूर झाल्यामुळे कोकणातून वाशी मार्केटला रोज 27 हजार पेटी हापूस दाखल होत आहे. त्यातील 282 मेट्रीक टन हापूस कुवेत, बहरीन, संयुक्त अरब अमिरातीला जहाज मार्गे पाठविण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. पंधरा कंटेनरमधून हा आंबा येत्या दोन दिवसात रवाना होईल असे पणन मंडळाकडून सांगण्यात आले.

वाढत्या उष्म्यामुळे आंबा तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे; मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंबा विक्रीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

जगभरात कोरोनाचा धुमाकुळ सुरु झाल्याने त्याचा परिणाम हापूसच्या निर्यातीवरही झालेला होता. शुक्रवारपासून निर्यातीला सुरवात झाली असून पहिल्या टप्प्यात वाशी येथून 105 मेट्रीक टन हापूस समुद्रमार्गे संयुक्त अरब अमिराती, ओमानला गेला. त्यानंतर आता आखातातील तीन देशांमध्ये आणखीन 282 मेट्रीक टन आंबा पाठविण्यासाठी परवानगी मिळाली आहे. निर्यातीसाठी आवश्यक फायटोसॅनिटरी सर्टीफिकेट संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाले असून 15 कंटेनर वाशीतून बंदरावर पाठविले आहे. याचा प्रवास दोनच दिवसात सुरु होणार आहे. कुवेत, बहरीन, संयुक्त अरब अमिरातीला आंबा पोचण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात. निर्यातीसाठी आखाती देशांना फळे, भाजीपाला पुरवठा करणार्‍या निर्यातदारांनी पुढाकार घेतल्यामुळे कोकणातून आलेला आंबा वाशीमध्ये पडून राहणार नाही, याची हमी मिळू लागली आहे.

ग्राहकच उपलब्ध होत नसल्यामुळे वाशीतील अनेक अडत्यांनी कोकणातील बागायतदारांना हापूस पाठवू नका असे निरोप दिले होते. त्यामुळे आंबा बागायतदार निराश झाले होते. पणन, कृषी मंडळाच्या संयुक्त प्रयत्नातून निर्यातीला चालना मिळाल्याने आपसूकच व्यापारीही आंबा घेण्यासाठी सरसावले आहेत; परंतु पेटीचा दर पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतच मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

मंगळवारी (ता. 7) कोकणातून एकाच दिवशी 12 ट्रक आणि 108 टेम्पोमधून 27 हजार 863 आंबा पेटी वाशीत दाखल झाली. त्यातून सुमारे 400 मेट्रीक टन हापूस मिळाला आहे. गतवर्षी याच कालावधीत 60 ते 70 हजार पेटी आंबा कोकणातून वाशीत जात होता, आता त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. 12 एप्रिलनंतर मोठ्याप्रमाणात आंबा तयार होणार असून तोपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पॅकिंग साहित्य मिळवताना तारांबळ 

निर्यात सुरु झाली असली तरीही त्यासाठी आवश्यक पॅकिंग साहित्याचा तुटवडा वाशीमध्ये जाणवत आहे. हे साहित्य बनविणार्‍या कंपन्यांना परवानग्या संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून दिल्या जातात. त्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ते सुरळीत होईपर्यंत पॅकिंग साहित्य मिळवताना संबंधित व्यापार्‍यांची तारांबळ उडत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com