Raigad Rain Update : पावसाचं थैमान! रायगड जिल्ह्यात आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

IMD ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला
Raigad  Rain Update
Raigad Rain UpdateSakal

Raigad Rain Update : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.

IMD ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

त्यामुळे, धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडले जात असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील २४ तासांतही शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात माणगावनंतर (२५४ मिमी) सर्वाधिक पाऊस खालापूर तालुक्यात पडला आहे. पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर इतकी आहे, तर धोकापातळी २१.५२ मीटर आहे. चोवीस तासांत विक्रमी पाऊस पडल्याने पाताळगंगा नदी इशारा पातळी ओलांडून (२१.२०मी.) धोक्याच्या पातळी ओलांडण्याच्या स्‍थितीत आहे.

पाताळगंगा नदीपात्रात सोमवारी मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून तहसीलदार आयुब तांबोळी यांनी, दरडप्रवण तसेच किनाऱ्यावरील रहिवासी भागाची पाहणी केली. पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत काही ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी साचल्याने दुचाकीस्‍वारांना कसरत करावी लागली.

दांड-आपटा रस्‍त्‍यावर आपटा गावाजवळ पाणी साचल्याने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. खोपोलीत अनेक सखल भागात पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्‍याने पूरपरिस्‍थिती टळली, मात्र मासेमारी तसेच इतर कारणासाठी नदीकाठी जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

पोलादपूर तालुक्‍यात दक्षतेचा इशारा

पोलादपूर : गेल्‍या दोन दिवसांपासून सुरू असलेल्‍या संततधारेने पोलादपूर तालुक्‍याला झोडपून काढले आहे. सावित्री नदीसह इतर उपनद्या दुथडी भरून वाहत असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नदीकिनारी तसेच डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून आपत्‍कालीन परिस्‍थिती उद्‌भवल्‍यास त्‍वरित स्‍थलांतरित होण्याच्या सूचना करण्यात आल्‍या आहेत.

Raigad  Rain Update
Raigad Politics News : शेकापच्या अस्तित्वाला घरघर; रायगड जिल्ह्यातील ताकद संपण्याच्या मार्गावर; पक्षाला गळती

काथोड धबधब्यावर बंदोबस्‍ताची मागणी

पेण : पेणपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्‍या सातेरिया दुर्गम भागात काथोड धबधब्‍यावर पर्यटकांच गर्दी होत आहे. गेल्‍या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. याठिकाणी धोक्‍याचे फलक लावले असले तरी पर्यटकांना वर्षासहलीसाठी मोठ्या संख्येने येत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्‍थानिकांकडून होत आहे.

कुंडलिकेने ओलांडली इशारा पातळी

रोहा : शहरातील कुंडलिका नदीने सोमवारी सायंकाळी इशारा पातळी ओलांडली. त्‍याअनुषंगाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा फटका शहराबरोबरच ग्रामीण भागालाही बसला असून जनजीवन विस्‍कळित झाले आहे.

तालुक्‍यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्‍याने नागरिकांचे हाल झाले. शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्‍याने खोलीचा अंदाज येत नसल्‍याने लहान-मोठे अपघाताच्या घटना घडल्‍या. तर खड्ड्यात पडून काही पादचारी जखमी झाले आहेत. वारंवार तक्रार करूनही खड्डे जैसे थे असल्‍याने नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्‍त करण्यात येत आहे.

Raigad  Rain Update
Raigad School News : शिक्षणाचा बोजवारा; रायगड जिल्ह्यातील १६० शाळा शिक्षकांविना...

भेरवमधील अंबा नदीवरील पूल पाण्याखाली

पाली : कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पुढील पाच दिवस अतिवृष्‍टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुधागड तालुक्यातील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून भेरव येथील अंबा नदीच्या पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली.

मंगळवारी दुपारपर्यंत भेरव नदीवरील पूल पाण्याखाली होता. त्यामुळे विद्यार्थ्‍यांसह नोकरदार वर्ग, प्रवाशांचे हाल झाले. भेरव पूल पाण्याखाली गेल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला शाळेत जाता न आल्‍याने विद्यार्थ्यांना सुटी मिळाली. पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काहींनी उद्धरमार्गे प्रवास केला मात्र वळसा घालून जावे लागल्‍याने वेळ व पैसा नाहक खर्ची पडला.

Raigad  Rain Update
Raigad Rain Update : रायगडमध्ये जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची लगबग; आतापर्यंत २६ टक्के पूर्ण

पातळगंगेचे पाणी रसायनीतील रस्त्‍यावर

रसायनी : रसायनीत सोमवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्‍याने आपटा येथील बस थांबा, शंकराचे मंदिर परिसर आणि मुख्य दांड-पेण रस्‍ता पाण्याखाली गेला.

परिणामी आपटे, पेण, उरणकडे जाणारी वाहतूक पूर ओसरेपर्यंत चावणेमार्ग वळवण्यात आली होती. वासांबे-मोहोपाडा, पनवेलकडे जाणाऱ्यांची मात्र यामुळे गैरसोय झाली. दुपारनंतर वाहतूक आपटेमार्गे पूर्ववत झाल्‍याचे रसायनी पोलिसांनी सांगितले.

पातळगंगा नदीची पातळी वाढली की मुख्य रस्‍त्‍यावर तीन ठिकाणी पाणी येत असल्‍याने वाहतूक ठप्प होते. याठिकाणी उपाययोजना करावी यासाठी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर व ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com