बोरघर येथील नाईकवाडी (आदिवासीवाडी) ला पुराच्या पाण्याचा फटका

Flood
Flood

२१ कुटुंबाच्या जीवाला धोका
खेड - बोरघर येथील आदिवासी - कातकरी समाजाची वस्ती अनेक वर्षांपासून पाताळी नदीच्या तंतोतंत काठावर व चिंचवली - वावे वरून येणा-या दोन नद्यांचाही संगम याच वस्तीजवळ होतो. पावसाळ्यात या सगळ्या नद्यांना मोठा पूर येत असल्यामुळे या वस्तीला दरवर्षी मोठ्या आपत्तिला सामोरं जावं लागत आहे. या ठिकाणी १७ घरे असून २१ कुटुंबे आहेत. या लोकांचं पुनर्वसन करावं अशी मागणी बोरघरचे माजी सरपंच  उदय बोरकर गेली अनेक वर्षे करत आहेत. 

गेले अनेक वर्षे पाताळी नदीतील झाडी व गाळ शासनामार्फत काढलाच गेलेला नाही. त्यातच आता या वस्तीच्या समोरच नदीच्या पलीकडील बाजूस राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अर्ध्या नदीच्या पात्रातच केले गेले असल्यामुळे नदीचे पात्र अर्ध्यावर आले आहे. सोबतच स्त्याची उंची ही वाढविण्यात आली आहे. या सर्व बाबींचा परिणाम नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे आता या पावसाळ्यात अतिवृष्टिच्या कालावधीत कातकरीवाडीतील घरांमध्ये ताबडतोब जलद गतीने पुराचे पाणी घुसत आहे. 

गेले दोन दिवस अतिवृष्टिमुळे नद्याना पूर आला असून नदीकाठच्या या वस्तीला पुराच्या पाण्याने वेढले असून घराघरांत पाणी शिरले आहे. ४ घरांची पुरामुळे पडझड झाली असून घरातील अन्नधान्य, भांडी, कपडालत्ता अशा गोष्टी पुरात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबावर मोठी आपत्ति आली असून मुला बाळांचे, महिला-माणसांचे खुप हाल होत आहेत. बोरघर येथे जिल्हाधिकारी रत्नागिरी व पुनर्वसन संचालक यांचे नावे असलेली मोकळी जागा आहे. या ठिकाणी आदिवासी लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा भेटून व पत्रव्यवहार करून सरपंच या नात्याने  उदय बोरकर यांनी मागणी केलेली आहे. परंतु,  याकडे प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत गेलेले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पूर येतंय व शासनाची लोकं येऊन पंचनामा करून जातात. शासनाची दोनचार हजाराची मदत या लोकांच्या हातावर ठेवली जाते किंवा एखादा नेता येतो वीस-चाळीस रुपयाचे अन्नाचे पुडे हातात देतात व फोटो काढतात, पेपर किंवा मिडीयात देतात अन् गायब होतात. परंतु, या लोकांची खरी वेदना कुणी अद्याप जाणूनच घेतली नाही. या लोकांकडे पाहिले गेले ते केवळ मतदानाचे बाहूले ! या यांच्या हालअपेष्टांना जबाबदार कोण असा प्रश्न  श्री. बोरकर यांनी  केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com