रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे ढासळत चाललेला मिऱ्या पंधरामाड येथील बंधारा वाहून गेला असून नारळाचे झाडही पाण्यात गायब झाले आहे. पावसाचा जोर वाढत असून किनाऱ्याला धोका निर्माण झाला आहे.
किनारपट्टी भागात सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला उधाण आले. सोमवारी दुपारच्या सुमारास समुद्राला भरती आली आली होती. आज सकाळपासून वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उधाणाच्या लाटांचा जोरही वाढलेला आहे. अजस्त्र लाटा किनाऱ्या वरील भागात फुटत आहेत. उधाणाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा मिऱ्या किनारपट्टीला बसला. मिऱ्या येथील पंधरामाड धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला उधाणाच्या भरतीचा तडाखा बसला आहे. येथील मोरेवाडी येथे राहणाऱ्या सावंत यांच्या बागेचे नुकसान झाले आहे या परिसरातील बंधारा वाहून गेला असून किनाऱ्यावरील एक नारळाच झाड लाटांच्या माऱ्याने पडलं आहे. दुसरं झाडही पडण्याची शक्यता आहे.
लाटांचे पाणी घराच्या परिसरात येऊ लागले आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. उधाणाच्या लाटांनी धुप प्रतिबंधक बंधाऱ्याचे दगड समुद्राने गिळंकृत केले असून बंधाऱयाला मोठे भगदाड पडलं आहे पावसाचा जोर कायम राहिला तर या भागाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, किनारपट्टी भागातील काळबादेवी, साखरतर, गावखडी, आरे, नेवरे, गणपतीपुळे, जयगड आदी भागात किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा येऊन आदळत होत्या. सलग दुसऱ्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या पाण्याने काही प्रमाणात रहिवासी भागात प्रवेश केल्याने ग्रामस्थांच्या उरात धडकी भरली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.