रत्नागिरीत येणाऱ्यांनो नियम पाळा, अन्यथा `पूनश्च हरिओम`...

Ratnagiri administration Warning of workers
Ratnagiri administration Warning of workers

रत्नागिरी -  गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांनी क्वारंटाईनचे निकष काटेकोरपणे पाळले पाहिजेत. ते पाळले नाहीत आणि गणेशोत्सवानंतर कोरोनाचे रुग्ण वाढल्यास कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज दिला. 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. गणेशोत्सवानंतर लॉकडाउन वाढवणार का? असा प्रश्न एका ग्रामस्थाने उपस्थित केला. यावर ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण असल्याने गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी नियम पाळून गावात राहावे. शासनाने आखून दिलेले धोरण पाळावे.

गावकऱ्यांनीदेखील चाकरमान्यांना मदत करावी. नियम पाळले न गेल्यास आणि गणेशोत्सवानंतरही कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास सात दिवसांचा लॉकडाउन केला जाऊ शकतो. 
गणेशोत्सव संपल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना तपासणी आणि टेस्ट करण्याची गरज नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले. अधिकारी म्हणून आम्हीही सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. काही तांत्रिक गोष्टींचा विचार करून ते पाळणे शक्‍य होत नाही. यापुढे ही खबरदारी बाळगू, असे मुंढे म्हणाले.

जिल्ह्यात आता 3 हजार कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी 70 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर 12 ते 13 टक्के आहे. मृत्यू दरदेखील वाढला आहे. तो कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात आता "अर्ली डिटेक्‍शन' मोहिमेची गरज आहे. थोडा जरी संशय आला तरी लवकरात लवकर टेस्टिंग करून घ्या. क्वारंटाईनचा कालावधी 10 दिवसांचाच आहे. त्यानंतर पाच दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. ज्या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत आणि जे तरुण आहेत; मात्र पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्यासाठी होम आयसोलेशनची मुभा आहे. 

शेवटच्या स्टेजला येतात 
कोरोना हा आजार जाती, धर्म, पंथांशी निगडित नाही. कोणालाही होऊ शकतो आणि परिणामही सर्वांना सारखेच भोगावे लागतात. आमचे रुग्णालयावर नियंत्रण आहे. आरोग्य सेवा चांगली देण्याबाबत बैठका होतात. सूचना दिल्या जातात. लक्षणे निर्माण झाल्यास लपवू नका. लगेच उपचार घ्या. शेवटच्या स्टेजला व्यक्ती उपचारासाठी दाखल झाल्यास दगावण्याची शक्‍यता असते, असे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. 
 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com