
रत्नागिरी : प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, सल्ला देण्यासाठी आत्मा योजनेतून शेतकरी मित्रांची नेमणूक केली होती. परंतु, गेल्या दोन वर्षांत अनुदानच न आल्याने त्यांचे काम थांबले आहे. प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करणारी कृषी विभागातील ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने शेतकरी मित्रांची उणीव भासत आहे. सध्याच्या परिस्थितीत हे मित्र शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरले असते. जिल्ह्यात ७६८ मित्रांची नेमणूक करण्यात आली होती.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षणं, सहली यासह प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते. शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी आत्मा योजनेतून पाच वर्षांपूर्वी शेतकरी मित्र ही संकल्पना राबविण्यात आली होती. दोन ग्रामपंचायतीला एक याप्रमाणे ही नियुक्ती केली होती. त्यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड केली गेली होती. जिल्ह्यात ७६८ शेतकरी मित्र पाच वर्षांपूर्वी कार्यरत होते. त्यामुळे आत्मा योजनेतून राबविण्यात येणारे प्रकल्प थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचत होते. रत्नागिरी जिल्हा दुर्गम भाग असल्यामुळे हे मित्र दुवा ठरले होते.
अनेकवेळा शेतामध्ये पडणारी कीड रोग यावरील उपाययोजनांची माहिती याच मित्रांमार्फत सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिली जात होती. या शेतकरी मित्रांना महिन्याला एक हजार रुपये अनुदान दिले जात होते. कोरोनातील परिस्थितीमध्येही हेच मित्र शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे दूत बनून काम करीत होते.
कोरोनातील परिस्थितीनंतर शासनाकडून आत्मा योजनेला निधीची तरतूदच कमी करण्यास सुरवात केली. गेली दोन वर्षे निधी कमी आल्यामुळे शेतकऱ्यांसाठीची प्रात्यक्षिकेही करता आलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी मित्रांना अनुदान देणे शक्यच नव्हते. त्यांचे कामही सध्या थांबलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.