रत्नागिरी : पावसाचे अर्धशतक; लावण्या ६० टक्क्‍यांहून अधिक

पावणेदोन महिन्यात ५५ टक्के पाऊस, चार दिवसांसाठी यलो अलर्ट
भात लावणी पूर्ण
भात लावणी पूर्ण sakal

रत्नागिरी : कोकणात मोसमी पावसाचे आगमन अनपेक्षितपणे लांबले असले तरीही मागील ४८ दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत ५५ टक्के मजल मारली आहे. पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असला तरीही सध्या जिल्ह्यात सरींचा पाऊस पडत आहे. भातशेतीसाठी समाधानकारक स्थिती असून आतापर्यंत ६० टक्के लावण्या पूर्ण झाल्या. जोर ओसरल्यामुळे पाणी नसलेल्या ठिकाणी शेतकऱ्‍यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

जूनच्या ३ तारखेपर्यंत जिल्ह्यात मोसमी पाऊस पडेल, असा अंदाज होता; मात्र मोसमी पावसाच्या आगमनासाठी जिल्हावासीयांना प्रतीक्षा करावी लागली. परिणामी भात रोपवाटिका तयार करण्याची कामेही उशिराने सुरू झाली. काही शेतकऱ्‍यांनी पावसाचा अंदाज घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या आटपून घेतल्या होत्या. पाऊस लांबल्यामुळे ते शेतकरी दुबार पेरणीच्या सावटाखाली होते.

१० जूनपासून मोसमी पावसाला आरंभ झाला. पुढील प्रवास अडखळतच होता. जून महिन्यात सरासरीही गाठता आली नव्हती. जुलै सुरू झाला आणि मुसळधार पावसाला आरंभ झाला. पुढील पंधरा दिवसात सरासरी भरून काढली. त्यामुळे खेड, दापोली, चिपळूण, राजापूरसह रत्नागिरी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. १ जूनपासून ४८ दिवसात जिल्ह्यात ५५ टक्के पाऊस झाला. शासकीय निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ३२४६ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो. त्या तुलनेत जुलैच्या पहिल्या पंधरावड्यात जिल्ह्यात १७६८ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात २९५० मि.मी. तर सर्वात कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात १३१३ मि.मी. इतका नोंदवला आहे. उर्वरित ७५ दिवसांत पावसाची केवळ ४७ टक्के सरासरी वाटचाल शिल्लक राहिली आहे.

जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे एक आठवडा रखडलेल्या भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवर भातलागवड होते. आतापर्यंत ६० टक्केहून अधिक भात लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नदीकिनारी भागातील भातलावण्या पूरपरिस्थितीमुळे थांबल्या होत्या. त्याही सुरू झाल्या आहेत. मागील आठवड्यातील शेवटच्या चार दिवसात सरींवर सरी पडत आहेत. त्याचा परिणाम पाणी नसलेल्या भागातील म्हणजेच कातळावरील किंवा डोंगराळ भागातील भात लावण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुका पर्जन्यमान (मि.मी.)

मंडणगड १८३९

दापोली १७१९

खेड १४०३

गुहागर १४२८

चिपळूण १७०६

संगमेश्वर १७९९

रत्नागिरी १३१३

लांजा २९८०

राजापूर १७२८

जिल्ह्यात भातपिकासाठी समाधानकारक स्थिती आहे. लावण्यांची कामे वेगाने सुरू आहेत. पाऊस कमी झाल्यामुळे शेतात तण वाढण्याची शक्यता आहे.

- व्ही. व्ही. दळवी, प्रभारी भात संशोधन अधिकारी

भातलागवडीला यंदाचा पाऊस चांगला आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी राहील. मे महिन्याच्या अखेरी पाऊस पडल्यामुळे पहिल्या बहरात गवत येऊन गेले. ते काढून साफसफाई केली आहे. त्यामुळे पुन्हा गवत येण्याचे प्रमाण कमी राहील.

- मिलिंद वैद्य, शेतकरी (रिळ, ता. रत्नागिरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com