
रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग चिखलात, ४० लाखांचा खर्च पाण्यात!
मंडणगड : मंडणगडचे प्रवेशद्वार असणाऱ्या म्हाप्रळपासून चिंचाळीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चिखलमय झाला आहे. चार वर्षांपासून प्रस्तावित असलेला व विविध कारणांनी रखडलेल्या आंबडवे-लोणंद या तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे मोसमी पावसाच्या आगमनालाच तीन तेरा वाजलेले दिसून आले. चार कि.मी. अंतरात चिखलाचा मोठा पट्टा निर्माण झाला असून राष्ट्रीय प्राधिकरणाच्या कृपेने प्रवासी, पर्यटकांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे. पहिल्याच दिवशी सहा वाहने घसरून अपघात घडले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या मंजूर कामासाठी जुन्या ठेकेदाराचे काम काढून घेऊन या कामावर नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला. रस्ता दुरुस्तीसाठी आमदार योगेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करून या प्रश्नाकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय अनेक नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या आहेत. ६ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनीही मे महिन्यापूर्वी रस्ता सुरळीत करण्याचे आदेश प्राधिकरणास दिले होते. स्थानिक तहसीलदार या कामी गेले तीन महिने सातत्याने पाठपुरावा करीत होते.
गेल्या वर्षी पावसाच्या तोंडावर चाळीस लाखांचा निधी खर्च करून पूर्णपणे नादुरुस्त भागाचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, साईडपट्टी व गटारे नसल्याने हे काम पावसाला सुरुवात झाली अन् आठ दिवसांतच पूर्णपणे बाद झाले. रस्त्यावरील खडी डांबरसह वाहून गेली. पूर्ण पावसात चिखलमय रस्त्यावरून वाहतूक करावी लागली. यंदा तर याच नादुरुस्त अंतरात नवीन ठेकेदाराने हंगाम संपल्यावर काँक्रिट रस्त्याचा घाट घातला. पहिल्या पावसानेच प्राधिकरणाच्या सर्व मनसुब्यावर पाणी फेरले. जुन्या ठेकेदाराने तीन वर्षांपूर्वी बांधलेला काँिक्रट रस्ताही एका वर्षाचा पाऊस झेलू शकलेला नाही, हा इतिहास लक्षात घेता प्राधिकरणाने काळजी घेणेआवश्यक होते.
पहिल्याच पावसात म्हाप्रळ-चिंचाळीपर्यंतच्या रस्त्याचे तीन-तेरा; चार कि.मी. अंतरात चिखल पट्टा
नेमके झालेय काय?
आवश्यक सोपस्कर पूर्ण झाले नाहीत जुन्या ठेकेदाराने सुस्थितील रस्ता खोदला खोदतानाचा उत्साह नंतर बारगळला
केवळ कागदावर दर्जा बदलून फसगत तालुकावासीय कायमस्वरुपी समस्याग्रस्त
या समस्या आजही कायम..
मंडणगड ते म्हाप्रळ सारे खड्डे तसेच अठरा कि.मी.साठी लागतो एक तास वाहनांचे दोन वर्षांपासून मोठे नुकसान
धड रस्त्याविना पुलापर्यंत जाणार कसे?
राष्ट्रीय महामार्ग हा केंद्राच्या अखत्यारितील विषय असल्याने विद्यमान खासदारांनी या विषयात लक्ष घालणे अपेक्षित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील म्हाप्रळ-आंबेत पुलाचे सदृढीकरणाच्या कामात त्यांनी जातीने लक्ष घातले. वाहतुकीला जेटीचा पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र, रस्ताच धड नसेल तर पुलापर्यंत वाहने पोहोचणार कशी? कोट्यवधी रुपयांच्या विनीयोगाचा उपयोग काय? हा प्रश्न आहे.
Web Title: Ratnagiri National Highway Mud Lakhs Spent Water
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..