जाधव यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने 'यांच्या' जबाबदारीत वाढ

Responsibility Of Uday Samant Increase Ratnagiri Marathi News
Responsibility Of Uday Samant Increase Ratnagiri Marathi News

चिपळूण ( रत्नागिरी ) - महाविकास आघाडीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला एकच मंत्रिपद मिळाले. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने सामंत यांची जबाबदारी वाढली आहे. विद्यमान मंत्र्यांनी केवळ मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हा केंद्रबिंदू मानून प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. तरच खऱ्या अर्थाने जिल्ह्याला मिळालेल्या एका मंत्रिपदाचा लाभ होईल. 

मागील पाच वर्षांचा काळ भाजपच्या सत्तेचा होता. जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही. त्यामुळे मंत्रिपदही नाही. शिवसेनेचे तीन आमदार असताना त्यांनाही मंत्रिपद नाही. मुंबईतील रवीद्र वायकर यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. रत्नागिरीचे उदय सामंत यांना म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्याचा उपयोग रत्नागिरी जिल्ह्याला होण्याची अपेक्षा आहे. सामंत यांनी चिपळुणातील म्हाडाचा प्रकल्प मार्गी लावण्याची घोषणा केली; पण त्याची वीटही रचली गेली नाही. भाजपने पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला नाही. त्यामुळे ठोस कामे झाली नाहीत. तरीही शिवसेनेचे चार आमदार निवडून आले. भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी असे दोन भाग पडतात. सर्व विभागाची कार्यालय रत्नागिरी येथे असली तरी मंडणगड, दापोली, खेड व गुहागरच्या माणसाला रत्नागिरीपर्यंत जाता येत नाही, म्हणून अनेक महत्त्वाच्या विभागांचे उपकेंद्र चिपळूणला सुरू करण्यात आले आहे. 

विकास साधणे सामंत यांना सहज शक्य
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही सामंत यांनाच मिळण्याची शक्‍यता आहे. जिल्हा नियोजन मंडळात भाजपचा आमदार नाही. त्यामुळे एकही विरोधक नाही. खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत यांच्याशी सामंत यांची चांगलीच नाळ जुळलेली आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेले आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, योगेश कदम, शेखर निकम यांना अपेक्षित निधी देत जिल्ह्याचा समतोल विकास साधणे सामंत यांना सहज शक्‍य आहे. 
- अडरेकर, कार्यकर्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 

दोघांनाही मंत्रिपद दिले जाईल, असे वाटले.. 

जिल्ह्याचा समतोल राखताना महाविकास आघाडीकडून उत्तर रत्नागिरीसाठी भास्कर जाधव आणि दक्षिण रत्नागिरीसाठी उदय सामंत यांना मंत्रिपद दिले जाईल, असे वाटले होते. परंतु नुकतेच झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केवळ उदय सामंत यांना संधी मिळाली. आघाडी सरकारमध्ये दोन वर्ष उदय सामंत जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्याकाळी जिल्ह्याचा समतोल विकास अपेक्षित होता. रत्नागिरीच्या तुलनेत अन्य तालुक्‍यात मोठी कामे त्याकाळापेक्षा अधिक चांगल्या तऱ्हेने व वेगाने होतील, अशी अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com