वाढत्या उष्म्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बिघडला

0
0

सावंतवाडी : पहिल्या टप्प्यात थंडीचा अभाव, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि आता उच्च तापमानाचा मारा, यामुळे तळ कोकणातील काजू पिकावर काही विपरीत परिणाम होताना दिसून आला आहे. मळगाव परिसरातील काही काजू बीवर काळे डाग पडलेले दिसत असून काही काजू बी पोल निघत असल्याचे काजू शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यंदा चांगले काजू पीक हाती येणार असल्याचा अंदाज होता; मात्र ऐन कालावधीत वातावरणातील बदलामुळे अनुकूल हवामान कोकणात आंबा, काजू हंगामावेळी दिसून आले नाही. पहिल्या टप्प्यातच पुरेशी थंडी काजू पिकाला मिळाली नाही. यावेळी रात्रीच्या किमान तापमानामध्ये घट दिसून आली नाही. थंडीचा प्रभाव तळकोकणात उशिरा जाणवला. यानंतर सुमारे आठवडाभर अवकाळी पावसाचा मारा आणि ढगाळ वातावरणाचे सावट आंबा व काजू पिकावर राहिल्याने ढेकण्या व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढला. त्यानंतर मात्र पुरेशी थंडी आंबा व काजू पिकाला मिळाली. त्यामुळे उशीर झाला तरी यंदा झाडाला चांगले काजू लगडलेले दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते; मात्र या काजूमध्ये प्रमाणापेक्षा जास्त बिया पोल निघत आहेत. यामुळे काही ठिकाणी शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. याच आठवड्यात तीन ते चार दिवस जिल्ह्यात तापमानाचा पारा ओलांडला गेला. सर्वच ठिकाणी 40 अंशापर्यंत पारा पोहोचला. याचा ओल्या काजू बीवर परिणाम जाणवला आहे. काही ठिकाणी या ओल्या काजू बीवर काळे डाग पडल्याचे आढळले आहे, तर पूर्वीच्या प्रतिकूल वातावरणामुळे काजू बी ही पोल निघत आहे. आठवड्याभरातच काढण्यात आलेले काजू बीमध्ये बरीच काजू बी ही काळपट पडलेली दिसून येत आहे. जी काजू बी अद्यापही झाडावर आहे, तसेच परिपक्व झालेले नाही ती उन्हाच्या तडाख्यामुळे काळपट होत आहे. यामध्ये कलमी काजू बागायतीच्या काजू बी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

काही प्रमाणात काजू काळे पडत आहेत. आम्ही या महिन्यात मोठ्या प्रमाणात काजू बी काढली. यात काही काजू पोल निघाले आहेत. हे एकप्रकारे नुकसानच आहे.

- सहदेव राऊळ, शेतकरी

दोन दिवसांपूर्वी 38 अंश सेल्सिअसवर तापमान गेले होते. त्यामुळे परिपक्व बियांची वाढ फारशी झाली नाही. उच्च तापमानामुळेही काजू बी काळी पडू शकते. पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे टी मॉस्किटो किंवा ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असल्याने आवश्‍यक ती काळजी बागायतदारांनी घ्यावी. तापमानात वाढ झाल्यास जमिनीतील आर्द्रता हवेत जाते. त्यामुळे गवताचे आच्छादन आणि पुरेसे पाणी काजू बागायतीस द्यावे.

                  - डॉ. गजभिये, काजू पीक विशेषज्ज्ञ फळ

संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com