'जीव गेल्यावर खबरदारी घेतली जाणार का'? ;  मुंबई गोवा महामार्गावरील रस्ता उखडला...

Road dug up Mumbai Goa highway in ratnagiri
Road dug up Mumbai Goa highway in ratnagiri

खेड (रत्नागिरी) :  मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात सुमारे ३० मीटरचा रस्ता पावसात पुर्णपणे उखडल्यामुळे या ठिकाणी जिवघेणा अपघात होण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. आहे. महामार्गाचे काॅक्रिटीकरण करताना ठेकेदाराने हा पट्टा पावसाचे पाणी मुरावे म्हणून तसाच ठेवला आहे. मात्र हे करताना मातीचा रस्ता उखडू  नये यासाठी कोणतीच खबरदारी घेतलेली नाही. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर खबरदारी घेतली जाणार आहे का? असा सवाल वाहन चालक उपस्थित करत आहेत.


मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली चार वर्षे सुरु आहे. कशेडी ते पर्शुराम घाट दरम्यानच्या ४४ किलोमिटर चे काम कल्याण टोलवेज ही कंपनी करत आहे. मात्र काम करताना अनेक ठिकाणी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने कंपनी कायम वादात राहिली आहे. दोन वर्षांपुर्वी उधळे येथे झालेल्या भिषण अपघातात एका लहान मूलासह दोघांचा मृत्यू झाला होता. या वेळी येथील नागरिकांनी सुमारे सहा तास महामार्ग रोखून धरला होता.


या घटनेनंतर ही कंपनी काही तरी बोध घेईल असे वाटले होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने काहीही बोध घेतलेला नाही. गेल्या वर्षीही पावसाळ्यात वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. काही ठिकाणी भरावाची माती रस्त्यावर येऊन अपघात होण्याच्या घटना घडल्या होत्या तर काही ठिकाणी चिखलमिश्रीत पाणी रस्त्यालगतच्या घरांमध्ये घुसले होते.
चौपदरीकरणाचे काम करताना पावसाळ्यात वाहन चालकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेणे ही ठेकेदार कंपनीची जबाबदारी आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला याची जाणीव करून देणे गरजेचे होते मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा त्रास प्रवाशी आणि चालकांना होत असल्याचे दिसत असतानाही संबधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हे दर्दैवी आहे. 


भोस्ते घाटात ठेकेदाराने ज्या ३० मीटरच्या पट्ट्यात क्राँक्रिटीकरण केले नाही. त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडणार हे निश्चित होते. त्यामुळे त्या पट्ट्यात पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते मात्र त्यांनी तशी कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात या पट्ट्यात मोठमोठे खड्डे पडले आणि चालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला .याच घाटातील एका अवघड वळणार मागील महिन्यात चार अपघात झाले. खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना समज दिल्यानंतर ठेकेदाराने उताराच्या बाजूने मोठमोठे गतीरोधक बसवले. मात्र पुढे गतीरोधक आहे  हे चालकांच्या लक्षात यावेत यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

परिणामी अनेक वाहने गतीरोधकावर आदळत असून या ठिकाणीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी या दोन्ही ठिकाणी कोणाचातरी मृत्यु ओढवण्याची वाट न पाहता आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.महामार्ग विभागाचे अधिकारी बामणे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता 'मी यात लक्ष घालून संबधित ठेकेदार कंपनीला आवश्यक ती खबरदारी घ्यायच्या सुचना देतो असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com